मतदार ‘अबकी बार ४०० पारचा नारा’ सार्थ ठरवतील

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

लोकांचा विश्‍वास मोदींवर आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे. त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. गेल्या १० वर्षात रेल्वे, हायवे, सिंचन सुविधा यात झालेला आमुलाग्र बदल जनतेसमोर आहे. तसेच जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजपा व मोदींवर प्रेम करणारा असल्याने येथील सर्व स्तरावरील मतदार हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ‘अबकी बार ४०० पारचा नारा’ सार्थ ठरवतील, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांनी केले. ते चाळीसगाव येथे भाजपा-शिवसेना, राष्ट्रवादी-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते. भर दुपारच्या वेळी घेण्यात आलेल्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा एकत्रित असा हा पहिलाच मेळावा चाळीसगाव येथे यशस्वी झाल्याने सर्वत्र उत्साह दिसत होता.

यावेळी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह माजी मंत्री एम.के.अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पवनराजे सोनवणे, रिपाईचे जळगाव लोकसभा प्रमुख आनंद खरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष नितीन पाटील, महायुतीचे घटकपक्ष शिवसेना तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांच्यासह महायुतीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

मेळाव्यात दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे यांचे वडील सुरेश साळुंखे तसेच आडगाव येथील बुथप्रमुख राजाराम हिरे यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्यात ना.गिरीष महाजन यांच्यासह आ.मंगेश चव्हाण, स्मिता वाघ, एम.के.अण्णा पाटील, साहेबराव घोडे, ज्ञानेश्‍वर पाटील जळकेकर, पवनराजे सोनवणे, संजय पवार, अमोल शिंदे, आनंद खरात, ज्येष्ठ नेते सुरेश सोनवणे, सुनील निकम, संजय पाटील, राजेंद्र राठोड, भावेश कोठावदे आदी महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जोरदार भाषणांच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले.

पक्ष सोडून जाणे जनतेची फसवणूक करणारे

पक्ष संघटनेत काम करत असताना अनेकांना संधी द्याव्या लागतात तर अनेकदा थांबावे लागते. कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए.टी.नाना, स्मिता वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे आपल्या जिल्ह्यातील देता येतील. त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाणे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच त्यांना त्यांची जागा कळेल.

एक लाखांचे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार

लोकसभेची निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची सत्ता कुणाच्या हातात असावी, त्याची असल्याने जनता कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी व ‘अबकी बार ४०० पार’ हा आकडा पार करण्यासाठी ना.गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ या विक्रमी मताधिक्याने लोकसभेत जातील, त्यात योगदान म्हणून चाळीसगाव तालुक्यातून आम्ही सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना एक लाखांचे मताधिक्य मिळवून देऊ, असा निर्धार व्यक्त केला असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

आईसारख्या पक्षाशी बेईमान करणारे घातकच

चाळीसगाव हा तालुका भाजपचा बालेकिल्ला आहे. तालुक्याने अनेक नेतृत्व जिल्ह्याला, राज्याला दिले. पक्षात अनेक चढउतार आले तरी त्यांनी पक्ष सोडला नाही. मात्र, ज्यांना अवघ्या १० वर्षात आमदारकी, खासदारकी मिळाली, जे ८ दिवसांपूर्वी पक्षाला आई म्हणत होते त्यांनी पक्षाने एक संधी नाकारताच आईसारख्या पक्षाशी बेईमानी केली. असे व्यक्ती कोणत्याही विचारधारेशी किंवा पक्षाशी एकनिष्ठ नसतात, उलट समाजासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी घातक असतात, असेही आ.चव्हाण म्हणाले.

गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने काम करा

सर्व सिंचनाची प्रकल्प केवळ केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीनेच होऊ शकतात. त्यामुळे जळगाव जिल्ह्यालाच नव्हे तर खान्देशाला सिंचन सुबत्ता आणण्यासाठी केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बहुमताने निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठेही गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने व एकनिष्ठपणे १३ मे रोजी मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन आ.चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here