साईमत/ न्यूज नेटवर्क/ जामनेर :
तालुक्यातील केकतनिंभोरा, टाकळी, वाघारी, नेरी, पहुर, पाळधी चिलगाव, लोहारा गावात ६१३ वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी ४०९ ‘श्री’ सदस्य उपस्थित होते. रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) येथील श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जामनेर तालुक्यातील गावांमध्ये कडूनिंब, वड, पिंपळ, करंज, चिंच, आंबा, अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. दरवर्षाप्रमाणे यंदाही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वृक्षसंवर्धन करण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात येऊन त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वृक्षलागवडीत चिलगावच्या ‘श्री’ बैठकीतून शेंदुणीला २५ ‘श्री’ सदस्यांनी ५० वृक्षांची लागवड केली. तसेच वाघारीच्या ‘श्री’ बैठकीतून ४० ‘श्री’ सदस्यांनी ५०, नेरी ‘श्री’ बैठकीतून माळपिंप्रीला ७५ ‘श्री’ सदस्यांनी १०७, पाळधी ‘श्री’ बैठकीतून मराठी शाळेत २२ ‘श्री’ सदस्यांनी ४६, लोहारा ‘श्री’ बैठकीतून प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० ‘श्री’ सदस्यांनी ६०, टाकळी ‘श्री’ बैठकीतून स्मशानभूमीत १३४ ‘श्री’ सदस्यांनी १००, केकतनिंभोरा ‘श्री’ बैठकीतून हायवेवर दोन्ही बाजूने ७३ ‘श्री’ सदस्यांनी २०० वृक्षांची लागवड केली.
यांनी घेतला सहभाग
वृक्षलागवडीत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, शेंदुर्णीचे संजय गरुड, गोविंद अग्रवाल, शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, महेंद्र बाविस्कर, न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, नाना पाटील, गोरखनाथ बहिरे, अभय हिवरे, पाळधीचे सरपंच कमलाकर पाटील, देवपिंप्रीचे तुकाराम निकम, मोहन बावस्कर, संदीप सरताळे यांच्यासह मान्यवरांनी सहभाग घेतला होता.