साईमत, चोपडा : प्रतिनिधी
येथे जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एस.वाय. बीएस्सी. सेमिस्टर चौथे अभ्यासक्रम पुनर्रचनेवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी होते.कार्यशाळेचे उद्घाटन फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी. वाघुळदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेला जळगाव परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधून इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.एम. एन.लिदुरे, उपप्राचार्य प्रा.एन.एस.कोल्हे, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच विभाग प्रमुख प्रा.डॉ.ए.एल.चौधरी, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.एम.पी.भोळे, डॉ.के.डी. गायकवाड, डॉ.जी.डी. देशमुख, डॉ. एल.बी. पटले आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख तथा इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.ए. एल.चौधरी म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स विषयांमधील अभ्यासक्रम तयार करताना प्रात्यक्षिक व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमावर भर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या नवनिर्मिती क्षमतेला यातून चालना मिळेल. तसेच अभ्यासक्रमात नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी अभ्यासक्रम कसा करता येईल, यावर भर द्यावा, असे आव्हान केले.
इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार केल्यास विद्यार्थ्यांना विविध कौशल्य मिळतील. त्यामुळे नवीन रोजगार मिळतील. तसेच स्वतःचे कौशल्य वापरून नवीन उद्योग सुरू करण्यास अभ्यासक्रम असा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करण्यात यावा, असे फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे म्हणाले.
अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेत अभ्यासक्रम तयार करण्याच्या सत्राचे सूत्रसंचलन डॉ.के.डी. गायकवाड यांनी केले. या सत्रात बेसिक ॲनालाग व डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सपासून तर आरडी नो व त्याचा वापर तसेच इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या रोजच्या व्यवहारात उपयोग आदी नऊ पेपर्सवर चर्चा करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
इलेक्ट्रॉनिक्स हा विषय विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती क्षमता रुजविणारा आहे. त्यातून येणाऱ्या काळात निश्चितच विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्या अनुषंगाने अभ्यासक्रम निर्माण केल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल यात शंका नाही, असे अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी यांनी सांगितले.
यशस्वीतेसाठी पूनम गायकवाड, निशा पाटील, विजय शुक्ल, धीरज राठोड, हेमंत कन्हैया तसेच बीएस्सी व एमएस्सी. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन पूनम गायकवाड तर आभार डॉ.एल. बी. पटले यांनी मानले.