तहसीलदार महेंद्र माळी यांची माहिती
साईमत/धुळे/प्रतिनिधी :
तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटमुळे अनेक गावात झालेल्या नुकसानाची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू केल्याची माहिती शिरपुरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.
जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतपिके, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. त्याचबरोबर आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा यांनीही पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करुन अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील करवंद, बाळदे, जातोडे, उंटावद, भोरखेडा, भावेर, खरदे, आढे, सावळदे, पिंपरी, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, अजंदे, वाघाडी, अर्थे, लौकी, टेंभे बु., तरडी या गावात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहे. तसेच करवंद आणि वाघाडी या भागात तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केळी व पपईच्या नुकसान झालेल्या फळबागेची स्वत: पाहणी केली.
शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन
ज्या शेतकऱ्यांनी केळी व पपई फळपिकांचा पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत क्रॉप इन्श्युरन्स ॲप किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत (सूचना) द्यावी, असे आवाहनही तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.