अधिकाऱ्यासह ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे घडला अपघात
साईमत/नवापूर/प्रतिनिधी :
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाकीपाडा पुलावर महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात घडल्याची घडून युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्या सोबत असणारा युवक गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अधिकाऱ्यासह ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे एक निर्दोष वाहन चालकाचा मृत्यू झाला असून ह्याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आणि महामार्ग प्रशासन अधिकारी आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
सविस्तर असे की, गुजरात राज्यातील बडोदा येथील रहिवासी आशिष अशोक वसावा (वय अंदाजे ४०) हा दुचाकीने (क्र.जी. जे.०६ जेएन ३८०१) धुळेकडून सुरतकडे जात असताना वाकीपाडा येथील वाहतूक बंद असलेल्या पुलांच्या अलीकडे मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने दुचाकी जवळपास १५ फुट हवेमध्ये उंच उडून दुचाकीवरील दोघे रस्त्यावर आदळले होते. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच्यासोबत असणारा नयन वढेल (रा.बडोदा) हा गंभीर जखमी झाला होता. त्याला व्यारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नवापूर पोलीस आणि १०८ चे चालक लाजरस गावित यांनी अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदतकार्य केले.
अपघातामुळे अधिकाऱ्यासह ठेकेदाराचा हलगर्जीपणा उघड
नवापूर शहरापासून काही अंतरावरील सुरत-धुळे महामार्गावर वाकीपाडा गावालगत वाहतूक बंद असलेल्या पुलावर महामार्ग प्रशासनाकडून वाहतूक बंदचा सूचना फलक आहे. त्याच मार्गावरील सूचना फलकाजवळच वे ब्रीज आहे. त्यामुळे वाहन जाण्यासाठी एकेरी मार्ग काढल्यामुळेच हा अपघात घडला आहे. अपघाताच्या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी, चौपदरीकरण करणारा ठेकेदाराचा हलगर्जीपणा उघड झाला आहे.