पुनगाव येथे पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

0
2

साईमत लाईव्ह  धानोरा ता.चोपडा  ः वार्ताहर

शेतकर्‍याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या बैलावर बिबट्याने हल्ला चढवून यात बैल ठार झाला ही घटना पुनगाव ता. चोपडा येथे शनिवारी रात्री निवृत्ती जगन्नाथ सोनवणे यांच्या खळ्यात घडली. यात शेतकर्‍याचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत बिबट्याने सहा वेळा या परिसरात हल्ला करून आठ जनावरे ठार केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

तसेच गुरुवारी रात्री विकास लक्ष्मण खांजोडे (कोळन्हावी शिवार) यांच्या बकरीवर हल्ला करून बिबट्याने ठार केली होती.बिबट्याने शनिवारी रात्री  बैलावर हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना रविवारी सकाळी शेतकरी निवृत्ती सोनवणे खळ्यात गेले असता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी वनविभागाला ही माहिती दिली. वनरक्षक सुमित्रा पावरा यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेजभूषण चौधरी, धानोरा यांनी या बैलाचे  शवविच्छेदन केले.

पुनगाव परिसरात तापीनदी असून या तापी नदीच्या दर्‍याखोर्‍यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हा बिबट्या वावरत असतो. त्याने आतापर्यंत सहा वेळा हल्ला करून आठ जनावरे ठार केली आहेत. याबाबत ग्रामस्थ व सरपंच यांनी वनविभाग अधिकार्‍यांना अनेकवेळा बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करूनही त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे म्हणून शेतकर्‍यांची एवढी जनावरे ठार झाली असून त्यांचे नुकसान झाले आहे परंतु आता तरी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देऊन त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुनगाव सरपंच किशोर बाविस्कर यांनी केली आहे.

आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांचे नुकसान झालेले नुकसानग्रस्त शेतकर्‍यांमध्ये नामदेव धुडकु सपकाळे -१ गाय, राजू एकनाथ कोळी-१ म्हैस, हिरामण उत्तम बाविस्कर- दोन बैल, एक म्हैस, हरी बाविस्कर- १ बैल, विकास लक्ष्मण खांजोडे- १ बकरी, निवृत्ती जगन्नाथ सोनवणे – १ बैल, अशी एकूण आठ जनावरे बिबट्याने ठार केली आहेत.तरी वन विभागाने तापीनदी परिसरामध्ये पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून सातपुडा जंगलात  किंवा इतरत्र सोडावे अशी मागणी पुनगाव ग्रामस्थ करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here