साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
नोकरी मिळत नसल्याने हताश झालेल्या नांदुरा तालुक्यातील शिरसोडीतील शेतकऱ्याच्या मुलाने शेतात एक एकर चंदनाचे झाडे लावून ‘लक्षाधीश’ बनला आहे. शिरसोडी या छोट्याशा गावातून आलेल्या जितेंद्र वानखेडे याचे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. चंदनाच्या झाडांच्या लागवडीसाठी अहोरात्र मेहनत घेऊन यशस्वी होण्याचे ज्वलंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. त्यामुळे जितेंद्र वानखेडे (रा.शिरसोडी, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) ह्याची महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, झारखंड तसेच भारताच्या कानाकोपऱ्यातून शेतातील चंदनाच्या झाडांसाठी यशस्वी उत्तम मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या होणाऱ्या चंदन शिबिरासाठी महाराष्ट्रातून जितेंद्र वानखेडे यांची कर्नाटक येथे मार्गदर्शन म्हणून निवड केली आहे.
जितेंद्र वानखेडे यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार, उत्तम चंदन मार्गदर्शक म्हणून वनश्री पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनच्यावतीने विविध पुरस्कार देऊन २०२३ मध्ये सन्मानित केले आहे. तसेच एकरी तीनशे चंदनाचे झाडे लावून दहा ते बारा वर्षात एक ते तीन कोटी रुपयांपर्यंत शेतकऱ्याला मोबदला योग्य मार्गदर्शन करून मिळविता येणार असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.
धकाधकीच्या जीवनात नोकरी मिळेनाशी झाली होती. हाताला काम नसल्याने डगमगून न जाता शेतकऱ्याचा मुलगा जितेंद्र वानखेडे याने कधीही हार मानली नाही तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. मग का आपण शेती करू नये, हा ध्यास मनात धरून त्याने शेती व्यवसायाकडे आपला कल नेत चंदनाचे झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे संगोपन करीत एक उत्तम शेतकरी बांधला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये चंदनाच्या झाडांविषयी मार्गदर्शन करून लाखो रुपये कमवित असण्याचे एक अत्यंत बोलके उदाहरण आपल्यासमोर वानखेडे याने ठेवले आहे.
कोट्यधीश बनविणारे चंदनाचे पीक
पाच ते सहा वर्षांपासून चंदनाच्या झाडाविषयी वेगवेगळ्या राज्यात जाऊन रात्री-बेरात्री शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झाडाची पाहणी करीत झाडाला कोणते पोषक आहार, कोणते खत किती दिवसांनी चंदनाच्या झाडांना पाणी सोडायचे त्याचबरोबर झाडाची पाहणी कोण्ात्या प्रकारे करायची अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून योग्य शेतकरी एक एकरामध्ये शेतातून ३०० चंदनाच्या झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना १० ते १२ वर्षांत कोट्यधीश बनविणारे पीक आहे.