साईमत, चोपडा : प्रतिनिधी
सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या मास्टर परिपत्रकानुसार तातडीची व इतर मदत द्यावी. तसेच वीज मंडळाने तात्काळ निर्णय न घेतल्यास सोमवारनंतर केव्हाही तालुक्यात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकरी कृती समितीने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ना.गिरीश महाजन, ना.अनिल पाटील, जिल्हाधिकारी यांनाही दिल्या आहेत.
डोक्यावर दुष्काळाचे ढग असतांना आणि ७५ टक्के हंगाम हातचा गेला असताना वेळीच कृत्रिम पाऊस पाडण्याची विनंती लक्षात न घेतल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कूपनलिकांद्वारे थोडेफार येणारे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असताना वीज मंडळाने शेती वीजपंपासाठी झिरो लोडशेडींग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यासाठी भलेही औद्योगिक वीज कमी द्या, पण शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून द्या, म्हणजे किमान खायची तरी सोय होईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
‘आत्मक्लेश आंदोलन अन् आमरण उपोषण’
शेतकऱ्यांचे २०१४-१५ चे ऊस बिलातील ठेव म्हणून ठेवलेली १५० रुपये प्रतिटनप्रमाणे रक्कम ३.३० रुपये कोटी अद्याप न मिळाल्याने कारखान्याचे व्हा.चेअरमन एस.बी.पाटील हे ११ सप्टेंबर २०२३ पासून ‘आत्मक्लेश आंदोलन आणि आमरण उपोषण’ करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले. यावेळी एस.बी.पाटील, प्रशांत पाटील, कुलदीप राजपूत, भागवत महाजन, प्रा. प्रदीप पाटील, जगदीश बोरसे, संतोष पाटील, गुलाब पाटील, बी.आर.एस. पक्षाचे दीपक पाटील उपस्थित होते.