साईमत, जळगाव : प्रतिनिधी
जिल्हाभरात प्रशासनाच्या कामात सुसूत्रता यावी, यासाठी सर्व विभागांचे २१ भाग केले असून एका वेळी चार विभागांची बैठक आयोजित करून त्य्ााच्या महिनाभरातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वच कामांचा यातून पाठपुरावा करणे सुलभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.जिल्हाधिऱ्यांनी पदभार घेऊन गुरूवारी एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात जिल्हाधिकाऱ्यांनी कुठली कामे केली. याचा लेखाजोखा सर्व विभाग प्रमुखांना बोलवून सादर केला. यावेळी कुपोषणाबाबत त्यांनी खबरदारीचे उपाययोजना करण्याचे विभाग प्रमुखांना आदेश देऊन दर आठवड्याला तपासणी करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात मूबलक खत साठा उपलब्ध
जिल्ह्यात पूर्वीचा १८ हजार मेट्रिक टन खत साठा होता. बुधवारी ३ हजार मेट्रिक टन गुरुवारी ३ हजार मेट्रिक टन असा ६ हजार खत साठा उपलब्ध झाला असून जिल्ह्यात २५ हजार मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे. कुठेही टंचाई नाही. टंचाईच्या अफवा आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लम्पी रोगाने ५ तालुके बाधित; लसीकरण सुरू
जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, पारोळा येथे लम्पी रोगाने थैमान घातले आहे. यासाठी लसीकरण सुरू असून जिल्ह्यात येत्या आठवड्यात लसीकरण पूर्ण होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. बाधित जनावरांची प्रकृती ठिक झाल्यावर किमान १० ते १५ दिवस त्यांना कामावर जुंपू नये, त्यांना विश्रांती द्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कुपोषणाबाबत तातडीने उपाययोजना करा: जिल्हाधिकारी
जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढ होत असून जिल्ह्यात तीव्र कुपोषित १८८९ बालके असून मध्यम कुपोषित ७३२६ बालके आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत एकूण २२ प्रकल्प व ३९४४ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी १९ प्रकल्प हे ग्रामीण भागात आहेत. यात ३४३५ अंगणवाड्या आहेत. तर ३ शहरी प्रकल्पात ५०९ अंगणवाड्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण क्षेत्रातील ३४३५ अंगणवाडी केंद्रात २ लाख ५७ हजार १३० बालके असून त्यापैकी १८८९ बालके अतितीव्र कुपोषित, तर ७३२६ बालके मध्यम कुपोषित श्रेणीत आहेत. तर उर्वरित २ लाख ४७ हजार ९१५ बालके सर्वसाधारण श्रेणीत आहेत.
कुपोषणासाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबवणार
कुपोषण कमी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या महिन्यात प्रत्येक अंगणवाडी केंद्र, शाळा, आरोग्य केंद्र तसेच प्रत्येक गावात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.