पाडळसरे धरणात दोन वर्षांत
पाणी येईल – बोरकर
अमळनेर ( प्रतिनिधी)-
निम्न तापी प्रकल्पातील पाडळसरे धरणात दोन वर्षांत पाणी अडवले जाईल, असे नियोजन असून बांधकामाला वेग देण्यात आला आहे. पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाला चर्चेत तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज. द. बोरकर यांनी ही माहिती दिली.
धरणाच्या गेटसाठी टाय प्लेट्स पोहोचल्या असून, गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यंदाचा निधी जूनपर्यंत खर्च करण्याचे नियोजन असून पुढील वर्षी निधी प्राप्त झाल्यास दोन वर्षांत धरणाचे गेट्स पूर्णत्वास येतील आणि पाणीसाठा दिसू लागेल.
पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सातत्याने पाठपुरावा करत आहे. या समितीने मुख्य अभियंता बोरकर यांची भेट घेतली. बैठकीत धरणाच्या कामाच्या प्रगतीसह निधीबाबत प्रश्न विचारण्यात आले. अभियंता बोरकर यांनी धरणाच्या बांधकामासोबत उपसा सिंचन योजना, पाईपलाईन आणि पंपिंग स्टेशनचे कामदेखील समांतर सुरू असल्याची माहिती दिली.
यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हेमंत भांडारकर, अमळनेर अर्बन बँकेचे व्हॉईस चेअरमन रणजित शिंदे आणि सुनिल पाटील यांनी निधी धरणाच्या कामावरच खर्च करावा आणि पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत या धरणाचा तातडीने समावेश करावा, अशी मागणी केली. राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले. समितीने आंदोलनाची तयारी ठेवली असल्याचे स्पष्ट केले.
मुख्य अभियंता बोरकर यांचे या प्रकल्पासाठी तीन वर्षांत केलेल्या उत्कृष्ट तांत्रिक कार्याबद्दल समितीतर्फे सत्कार करण्यात आला.