दोघा चोरट्यांना राजस्थानातून अटक ; जळगाव एलसीबीची कामगिरी
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
गेल्या ९ एप्रिल रोजी जळगाव शहरातून चोरीला गेलेल्या तीन महागड्या चारचाकी वाहनांचा तब्बल महिन्याभरानंतर जळगाव पोलिसांनी छडा लावला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने राजस्थानमधील वाळवंटी प्रदेशातून या वाहनांचा शोध घेत दोन संशयितांना बुधवारी, ७ मे रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. तसेच दोन चोरीच्या गाड्याही हस्तगत केल्या असल्याचे सांगण्यात आले. वाहनांच्या चोरी प्रकरणी शहरातील जिल्हापेठ, रामानंदनगर आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, एलसीबीच्या यशस्वी कामगिरीमुळे वाहनचोरीच्या गुन्ह्याला यश मिळाले आहे.
वाहनांची चोरी प्रकरणी गुन्हे झाल्यानंतर, स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू होता. त्याचवेळी एलसीबीचे पथकही समांतर तपास करत होते. पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांना त्यांच्या एका गोपनीय खबरीकडून या वाहनांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी काही मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून चोरीला गेलेल्या चारचाकी वाहनांचे धागेदोरे राजस्थानमधील सांचोर, जि.जालोर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी तीन पोलिसांच्या पथकासह तातडीने राजस्थान गाठले.
राजस्थानातील सांचोर येथे स्थानिक पोलिसांनी मदत केल्यानंतर, एलसीबीच्या पथकाने सुनील पीता केशाराम बिष्णोई (वय २५) आणि सुनील पीता ओमप्रकाश बिष्णोई (वय २४, दोघेही रा.सरनाऊ, ता.सांचोर, जि.जालोर, राजस्थान) अशा दोन संशयितांना अटक केली. त्या दोघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या इतर दोन साथीदारांची माहिती पोलिसांना दिली. अटक केलेल्या दोन्ही संशयितांना पोलिस कर्मचारी अतुल वंजारी व हरीलाल पाटील यांनी राजस्थानमधून जळगावला आणले. तसेच उपनिरीक्षक शरद बागल यांनी त्याच परिसरात तळ ठोकून तपास सुरू ठेवला.
तिसऱ्या कारचा शोध सुरु
काही दिवस विरळ वस्ती असलेल्या वालुकामय भागात शोध घेतल्यानंतर एका जंगलात पोलिसांना बेवारस स्थितीत एक कार आढळून आली. त्या कारचा फोटो फिर्यादीला पाठविल्यानंतर ती चोरीला गेलेली कार असल्याची खात्री झाली. पोलिसांनी तात्काळ ही कार ताब्यात घेऊन जळगावला आणली आहे. उर्वरित आरोपी आणि तिसऱ्या चोरीच्या कारचा शोध अद्याप सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.