‘Global Warming’ : ‘ग्लोबल वार्मिंग’वर मात करण्यासाठी ‘वृक्षारोपण’ प्रभावी उपाय

0
45

मालदाभाडी शाळेतील कार्यक्रमात वनपाल ज्योती धनगर यांचे प्रतिपादन

साईमत/जामनेर/प्रतिनिधी : 

वाढत्या प्रदूषणामुळे आणि नैसर्गिक संतुलनाच्या बिघाडामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा संकटावर मात करण्यासाठी ‘वृक्षारोपण’ हाच प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन जामनेर येथील वनपाल अधिकारी ज्योती धनगर यांनी केले. त्या जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील न्यू इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित विशेष पर्यावरण जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक मारोती गाडेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेअंतर्गत शाळेत वृक्ष लागवड उपक्रम राबविण्यात आला. जामनेर सामाजिक वनीकरण विभाग आणि ग्रीन आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने “एक विद्यार्थी–एक झाड” अशा संकल्पनेतून शंभर वृक्षांचे वाटप करण्यात आले. झाडांच्या संगोपनातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनात सक्रिय भूमिका घ्यावी, असे धनगर यांनी आवाहन केले. गावातील विविध शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत अशा प्रकारचे वृक्षारोपण उपक्रम सातत्याने राबवले जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने मोहिमेत हातभार लावणे गरजेचे आहे, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

यशस्वीतेसाठी शिक्षक ए. बी. पाटील, जी. टी. पाटील, एन. एस. पाटील, एन. जी. पाटील, मनोज जैन यांच्यासह विद्यार्थिनी समृद्धी बोरसे, सृष्टी नेवल, खुशी पाटील, श्रेया कापसे, दिपीका सोनार, तसेच विद्यार्थी रोशन वंजारी, समर्थ परखड, रोहन पारधी, ओम गावंडे यांच्यासह ग्रीन आर्मीच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविकात ग्रीन आर्मीचे प्रमुख विजय सैतवाल यांनी वृक्षारोपण उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना अशा चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन आर. एल. कोळी तर आभार करुणा महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here