यावल : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेपासून अर्धा किलोमीटर अंतरावरील शिवाजीनगर, व्यास मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ढापा तुटल्याने दुचाकी, चार चाकी वाहनांसह इतर नागरिकांना येण्याजाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. याठिकाणी चार चाकी गाड्या आणि रिक्षा रस्त्यावरील तुटलेल्या ढाप्यात अडकून वाहनाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे यावल नगरपालिकेने याठिकाणी नवीन ढापा टाकण्याचे बांधकाम तात्काळ करावे, अशी मागणी शिवाजीनगरमधील व इतर नागरिकांनी यावल नगरपरिषदेकडे केली आहे. ढापाचे बांधकाम तात्काळ न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. अशा आशयाचे निवेदन गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी यावल नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. यावल नगरपालिका ढाप्याचे बांधकाम केव्हा करणार, याकडे शिवाजीनगरमधील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवाजीनगरमधील मुख्य रस्त्यावरील गटावरील ढापा तुटलेला आहे. त्यामुळे तेथुन ये-जा करण्यास नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. तसेच तो रस्ता यावल येथील लोकांचे श्रध्दास्थान असलेले महर्षी व्यास मंदीर येथे जाण्याचा एकमेव रस्ता असल्याने भाविकांनाही ये-जा करण्यास अडचणी येत आहे. तसेच तो ढापा तुटलेला असल्याने मोटार सायकल, फोर व्हीलर, रिक्षा, मोठ्या वाहनांचे सुध्दा त्या ठिकाणी टायर फसत आहे. वाहन धारकांनाही त्रास होत आहे. तसेच त्या भागातील शाळेत जाणारे विद्यार्थी, वृध्द व अपंग लोक हे त्याच रस्त्याने वापरत असल्याने त्यांनाही अनेक अडचणी येत आहे. नुकताच त्याठिकाणी रिक्षाचा मोठा अपघात होता होता टळला. त्याठिकाणी रिक्षा फसुन गेली होती. नागरिकांच्या सहकार्याने रिक्षा बाहेर काढण्यात आली. आपण तो ढापा त्वरित नवीन बांधावा, तेथुन ये-जा करणारे नागरिक, व्यासमंदिरात जाणारे भाविक, शाळेत जाणारे विद्यार्थी, वाहन धारक तेथील रहिवाश्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचवावे. तसेच तो ढापा दिलेल्या निवेदनानंतर ८ ते १० दिवसाच्या आत न झाल्यास तेथील रहिवांशासमवेत न.पा.समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाक्षरी करणाऱ्यांनी नगरपालिकेत दिला आहे.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
निवेदनावर नरेंद्र शिंदे, छाया भारंबे, किरण भगत, योगेश वाणी, निलेश चौधरी, प्रदीप पाटील, विशाल पाटील, विकी येवले, योगेश चव्हाण, विजय भगत, घनश्याम सोनवणे, उदयसिंग पाटील, आकाश पाटील, मयूर यादव, पुरुषोत्तम कुंभार, नितीन पाटील, राहुल निंबाळकर, उमेश कोळी, हेमंत कोळी, संतोष कोळी, विशाल कोळी, गौरव भोईटे, निलेश यादव, गणेश भोईटे, मुकेश तेली, योगेश पवार, दीपक सोनार, प्रशांत कोळी, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.