कापसाला भाव मिळण्यासाठी पहुरला शेतकऱ्यांनी घातले महादेवाला साकडे

0
3

साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर

येथील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्‍न देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करत सपत्नीक महादेवाला अभिषेक करत कापसाला भाव मिळण्यासाठी साकडे घातले. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकरी कापसाला भाव मिळत नसल्याने त्रस्त आहे. शासनाने घोषित केलेल्या हमी भावापेक्षाही कमी भावाने कापूस विक्री होत असल्याने गतवर्षी उत्पादित झालेला ४० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. यावर्षीही कापसाला प्रतिक्विंटल ६ हजार ५०० इतकाच भाव मिळत आहे. कापसाच्या उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव कापसाला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी गेल्या पाच वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहे. परंतु आपली सत्ता टिकविण्यात मग्न असलेल्या सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे सद्यस्थितीला चित्र आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्या मागण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तथापि न्यायालयाकडूनही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. शेवटी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी देवाचे देव महादेव यांना कापूस भावासाठी साकडे घातले आहे. जामनेर तालुक्यातील पहुर येथे कापूस उत्पादक शेतकरी कुटुंबाने सपत्नीक एकत्र येत महादेवाला सामूहिक अभिषेक करून कापसाला भाव वाढवून मिळावा, अशी मागणी केली. सर्व प्रयत्न फसले, त्यांच्या प्रयत्नाला यश येत नाही, असे दिसून आल्यावर देवाला साकडे घालून न्याय मागितला जात आहे. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. आता सरकारकडून न्याय मिळत नसल्याने हतबल झालेले शेतकरी देवाला साकडे घालत आहेत. हे शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

कापूस उत्पादक शेतकरी त्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याने सध्या हैराण आहे. सोयाबीनला भाव मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरही कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. कारण कांदा काढणीचा खर्च आणि तो शेतातून काढल्यानंतर बाजारात नेण्याचा खर्चही त्याला मिळत नसेल तर कांदा रस्त्यावर फेकण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे आता आपल्याला देवच वाचवू शकतो. म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्‍न देवासमोर मांडण्याचा प्रयत्न करत पहूर येथील शेतकरी सुरेखा घोंगडे, तुषार बनकर, अनिल घोंगडे, विनायक राऊत, संदीप बनकर, युवराज बनकर यांनी सपत्नीक महादेवाला अभिषेक करुन साकडे घातले.

…आता देवच शेतकऱ्यांना तारू शकतो

देशासह महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाची अवकृपा झाली की, पाऊस उशिरा पडतो, पेरण्या उशिरा होतात आणि पाऊस वेळेवर आला, पेरण्या व्यवस्थित झाल्या की, वादळी वारा, गारपीटमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उत्पादन घटते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते. दुष्काळात महाराष्ट्र तसेच देशातील शेतकरी सापडला आहे. त्यातच शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते. शेतकरी अजूनही असंघटित असल्याने त्याचा शासनापर्यंत आवाज पोहोचत नाही. शासनावर ते दबाव टाकू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधी राजकीय सत्तेत व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता देवच तारू शकतो, असे वाटत असल्याने देवाला साकडे घातले जात आहे. ही बाब शासनाच्या दृष्टीने अत्यंत लाजिरवाणी आहे, असे म्हणता येईल. आता त्यावर एकच उपाय म्हणजे आगामी निवडणुकीत शेतकऱ्यांनी आपल्या मताच्या अधिकाराचा हिसका दाखवून त्यांना घरी बसविण्याची योग्य वेळ आली असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here