चाळीसगावला कंपनीच्या गोडाऊनमधून चोरी करणाऱ्या तिघांना अटक

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहराला लागून असणाऱ्या खडकी शिवारातील एमआयडीसीमधील भारत वायररोप कंपनीच्या गोडाऊनमधून चोरी करणाऱ्या पाचोरा येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, तिघांना चाळीसगाव न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेला ४५ हजार ७५० रूपये किमतीचे इलेक्ट्रीक आणि पीपीकोर वायरचे सहा बंडले ताब्यात घेतले आहे.

सविस्तर असे की, चाळीसगाव येथील एमआयडीसीतील भारत वायर रोप कंपनीच्या गोडाऊनमधुन अज्ञात चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रीक वायरचे पाच बंडल आणि ७५० रुपये किमतीचे पीपीकोर वायरचे १ बंडल असा ४५ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत प्रिन्सकुमार श्रीराम नरेश गुप्ता यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना हवालदार योगेश बेलदार यांना माहिती मिळाली की, संशयित संजय शिवाजी कुऱ्हाडे (रा.आनंदवाडी, चाळीसगाव, हल्ली मुकाम कृष्णापुरी, पाचोरा), सोमनाथ महादु गायकवाड (रा.कृष्णापुरी, पाचोरा) आणि सागर बापू जाधव (रा.जुवार्डी, ता.भडगाव) यांनी ही चोरी केली आहे. याकामी हवालदार योगेश बेलदार, राहुल सोनवणे, भूषण पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे यांच्या पथकाने आरोपींताचा शोध घेऊन चोरीच्या गुन्ह्यात अटक केली.

आरोपीतांच्या पोलीस कोठडी दरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस आणण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here