साईमत, जळगाव : प्रतिनिधी
देशाच्या युवकांमध्ये नवकल्पना आणि सृजनशीलतेला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तुमच्याकडे उद्योगाची अनोखी कल्पना असेल तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. तसेच सध्या इनोव्हेशनची गरज प्रत्येक क्षेत्रात आहे. एखादा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते एखाद्या मशीनमधील अडचण शोधण्यासाठी इनोव्हेशनची गरज असते. कालानुरुप इनोव्हेशन हे क्षेत्र विस्तारत आहे. आज इतर क्षेत्राप्रमाणेच इनोव्हेशन क्षेत्रातही विद्यार्थ्यांना अनेक संधी खुणावत असल्याचे आशिष पानट यांनी सांगितले. तसेच इनोव्हेशन क्षेत्र, त्यात असलेल्या संधी आणि या क्षेत्राचा समाजासाठी जास्तीत-जास्त उपयोग कसा करावा, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात शुक्रवारी, २५ रोजी “इनोव्हेशन इन सायन्स – इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट” विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. परिषदेत मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाचे इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजचे संचालक डॉ. आशिष पानट हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेट विभागाचे डीन प्रा. डॉ. सौरभ गुप्ता, ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले उपस्थित होते. यावेळी संशोधकांनी सादर केलेले शोध निबंधाचे प्रोसिडिंग बुक प्रकाशित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य तत्पर
महाविद्यालयात आम्ही “जर्नी ऑफ इनोवेशन स्टार्टअप अँड इंटरप्रनर्शिप” वीक आयोजित करीत आहे. आठवडाभर चालणाऱ्या सोहळ्यात उद्योजक आणि भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम सक्षम करणाऱ्यांसाठी ज्ञान शेअरिंग सत्रे घेण्याचे ठरल्याने याच अनुषंगाने रायसोनी महाविद्यालयात “इनोव्हेशन इन सायन्स-इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट” या प्रमुख विषयावर विचारमंथन करण्यासाठी परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे मुख्य उद्दिष्ट संशोधक, अभियंते आणि उद्योजक यांना एकत्र आणणे आहे. ही परिषद तज्ज्ञ आणि तरुण संशोधकांसाठी “इनोव्हेशन इन सायन्स-इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट” क्षेत्रातील संशोधनाचा प्रसार करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. उद्योग ४.० व एज्युकेशन ४.० ही चौथी ओद्योगिक क्रांती आहे जी बऱ्याच समकालीन ऑटोमेशन, डेटा एक्सचेंज आणि मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा समावेश करते या क्रांतीसोबत आजच्या युवकांनी जुळायला पाहिजे. तसेच जागतिक स्तरावरील बदलत्या घडामोडींचे आकलन करून संगणक, व्यवस्थापन व इतर पूरक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यावर भर द्यावा. या बदलत्या परिस्थितीत करिअरचे नियोजन कसे करावे यांचे अनेक उदाहरणे देत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी १८० कॉपीराइट्स, ३५ पेटंट व ४० पेपर दाखल केल्याचे सांगत महाविद्यालयाच्या विविध उपक्रमाची माहिती तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी इन्स्टिट्युट सदैव कार्य तत्पर असल्याचे रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी प्रास्ताविकात सांगितले.
परिषदेत १५४ पैकी १२८ पेपरची निवड
प्राध्यापक, अभियंते, उद्योग जगतातील व्यक्ती तसेच संशोधक विद्यार्थी यांनी कॉन्फरन्ससाठी सादर केलेले रिसर्च पेपर्स आयएसबीएन क्रमांक असलेल्या नामांकित प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले जाणार आहेत. विविध राज्यांमधून जवळपास १५४ पेपर राष्ट्रीय परिषदेत सादर झाले. त्यातून १२८ पेपरची निवड करण्यात आली.
परिषदेच्या आयोजनाचे कौतुक
परिषदेत नामांकित शिक्षण संस्थांमधील प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगाव व परिसरातील उद्योजक, व्यावसायिक, प्राध्यापक ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या गर्दीने सभागृह मोठ्या संख्येने भरले होते. यशस्वीतेसाठी प्रा. जितेंद्र वडदकर, प्रा. तुषार वाघ, प्रा. योगेश वंजारी यांनी परिश्रम घेतले. परिषदेचे यशस्वीरित्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इन्स्टिट्युटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. ज्योती जाखेटे यांनी केले.