मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे (Shivsena)काही बंडखोर आमदारही मंत्रालयात उपस्थित होते. आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर आणि दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर आता मातोश्रीवर (Matoshri) जाणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर केसरकर यांनी खोचक पद्धतीनं उत्तर दिलं . रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवलं गेलं; पण आता रिक्षावाल्यांसाठी स्टँड तयार करणार आहोत. असा टोला लगावत जर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवलं तर आम्ही सर्व मातोश्रीवर जाणार असल्याचे सूचक विधानही केले.
मी काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होतो. यावेळी बोलताना ते म्हणाले, आपल्याकडे बस स्टँड असतात. बसमधून प्रवासी उतरला की तो रिक्षात बसून आपल्या घरी जातो. दोघेही एकमेकांसोबत जुळलेले आहेत. प्रवासी आगारातून किंवा बसमधून बाहेर येतो. मात्र, रिक्षेवाले बाहेर उन्हात उभे असतात. त्यांच्यासाठी काही करता येईल का, यावर विचार सुरू आहे. यावरून रिक्षावाला कसा विचार करतो, हे समजेल. रिक्षावाल्यांना हिणवण्यामध्ये आणि रिक्षावांल्याचे दु:ख समजून घेण्यामध्ये हाच फरक असतो, असे म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray)चिमटा काढला.
एकनाथ शिंदेंनी आज मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही मोठी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विकासासाठी झोकून काम करणार आहोत. देवाचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री दालन आता सर्वसामान्य लोकांसाठी उघडे झाले आहे. आज तो अनुभव आम्हाला अनेक वर्षांनंतर आला आहे. आजचा दिवस राजकारणापलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे, असे केसरकर म्हणाले. केसरकर म्हणाले, आता खऱ्या अर्थाने भाजप-सेना युती झाली आहे. ते लव्ह मॅरेजसारखं आहे.
आता त्या जोडप्याला पुन्हा घरी यायचं असेल तर दोघांच्या घरातील प्रमुख्यांनी आधी एकमेकांशी चर्चा करावी लागेल. आता आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धवसाहेबांना भाजपच्या प्रमुखांशी बोलावं लागेल. त्यांनी जर आम्हाला बोलावले तर आम्ही नक्कीच जाणार. मात्र उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असणारे जे काही बडवे आहेत ते तिथे नको. आम्ही थेट उद्धव ठाकरेंसोबत बोलू. तसेच आता आम्ही भाजपसह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यावर किती प्रेम करतात, ते माहीत नाही, ते शरद पवारांच्या खूप जवळचे आहेत. पक्ष धोक्यात आला, हे कळल्यावर माझे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा मी आमच्या नेत्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, असे केसरकर म्हणाले..