साईमत लाईव्ह यवतमाळ प्रतिनिधी :
तब्बल ४० आमदारांनी शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आता पक्ष संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र आता त्यांनी विदर्भाकडेही लक्ष केंद्रित केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराचा नारळ शिंदे गटात (Shinde Group)सामील झालेले मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore)त्यांच्या बालेकिल्ल्यातून फोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशीम) दौऱ्यावर लवकरच जाणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवी (Pohradevi) येथे भेट द्यावी, यासाठी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक व मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील राजू नाईक यांनी पुढाकार घेतला आहे. राजू नाईक यांनी मंगळवारी पोहरादेवी येथे भेट देऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले व पोहरादेवी भेटीचे निमंत्रण दिले. उद्धव ठाकरे हे लवकरच पोहरादेवी येथे भेट देऊन विदर्भात शिवसेना प्रचाराची सुरुवात करणार असल्याचे यावेळी राजू नाईक यांनी स्पष्ट केले. या भेटीवरून बंजारा समाजात दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राठोड यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर बंजारा समाजाची ताकद पुन्हा शिवसेनेच्या पाठीशी उभी करण्याचा ठाकरे यांचा प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. या सरकारमध्ये संजय राठोड यांच्यावर वन खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात एका युवतीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर राठोड यांनी पोहरादेवी येथे भेट देऊन शक्तिप्रदर्शन केले. गर्दी जमवल्यावरून शिवसेनेवर चौफेर टीका झाली होती.
दरम्यान, राठोड यांना पुन्हा मंत्री करावे, यासाठी पोहरादेवीतील महंत, बंजारा समाजातील विविध संस्था, संघटनांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र भाजपने या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतल्याने राठोड पुन्हा मंत्री होऊ शकले नाहीत. परंतु मागच्या महिन्यात घडलेल्या राजकीय घडामोडीत संजय राठोड दोन दिवस उद्धव ठाकरेंसोबत राहून नंतर शिंदे गटात सहभागी झाले. तेव्हा ‘संजय राठोड यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत केली याची खंत वाटते’, असे उद्धव ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते.