मुख्यमंत्री पद आणि शिवसेना पक्ष संकटात आलं. तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावनिक खेळपट्टीवर फलंदाजी करताना दिसले. उद्धव ठाकरे यांनी जनतेला, विशेषत: शिवसैनिकांना या पदाशी कसलीही ओढ नाही, हे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. ते म्हणाले की, “मी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी सकारात्मक नव्हतो. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून त्यांनी हे मान्य केलं. सरकार जाणार आहे पण समोरचे संकट यापेक्षा मोठे आहे हे उद्धव ठाकरेंना माहीत होते. हा सारा प्रकार लक्षात घेऊन ते भावनिक आवाहन करत होते. ज्या खेळपट्टीवर उद्धव आतापर्यंत फलंदाजी करत होते, त्याच खेळपट्टीवर एकनाथ शिंदेही फलंदाजी करताना दिसले.
बाळासाहेबांच्या नावानं भावनिक साद
विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवली. बंडखोर आमदारांसह आम्ही शिवसैनिक असल्याचं ते म्हणाले. आम्ही शिवसैनिक आहोत आणि सदैव बाळासाहेब आणि आनंद दिघे यांचे शिवसैनिक राहू असं ते म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट जिंकली. २८८ सदस्यांच्या सभागृहात १६४ आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनं मतदान केलं. तर ९९ आमदारांनी विरोधात मतदान केलं. फ्लोअर टेस्टपूर्वी, ठाकरे गटातील आणखी एक शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात सामील झाले. त्यामुळं शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० झाली आहे. अशा परिस्थीती शिवसेनेची सर्व सुत्र ठाकरेंच्या ताब्यातून शिंदेंच्या हातात जाण्याची चिन्ह आहेत. शिवसेना वाचवण्यासाठी बाळासाहेबांच्या नावानं भावनिक साद घातली. त्याच धर्तीवर एकनाथ शिंदेंनी शिवसेना जिंकण्यासाठी भावनिक साद घातली. ते म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मला अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण दिली आहे, त्यानुसार मी माझ्या ध्येयावर निघालो.” एकनाथ शिंदे पुढं म्हणाले की, बाळासाहेबांच्या मतदानावर ६ वर्षे बंदी घातली ती कोण होती? याची आठवण करून द्यावीशी वाटते.”
कुटुंबावर हल्ला झाल्याचं सांगत भावनिक झाले शिंदे
विश्वासदर्शक ठरावानंतर आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, “माझ्या कुटुंबावर हल्ला झाला. माझे वडील जिवंत आहेत, माझी आई वारली आहे. मी माझ्या कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकलो नाही. माझी दोन मुले मरण पावली. तेव्हा आनंद दिघे यांनी माझे सांत्वन करून मला आधार दिला. मला वाटायचे, जगण्यासारखे काय आहे.” मुलांची आठवण करून त्यांचे डोळे भरून आले. सुमारे २२ वर्षें जुनी घटना आठवून ते भावूक झाले. त्यानंतर मुलगा दिपेश आणि मुलगी शुभदा यांचा डोळ्यासमोर नदीत बुडून मृत्यू झाला.
आता शिवसेना ही हातून सोडावी लागेल, उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडली आहे. आता शिवसेना पक्षप्रमुख पदाचं सिंहासन सुद्धा उद्धव ठाकरेंना सोडावं लागेल अशी परिस्थीती निर्माण झालीये. आता महाराष्ट्रात शिवसेनेला काबीज करण्याचा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत झाली आहे. त्यांच्यासोबत बहुतांश आमदार आधीच सामील झाले आहेत. त्याचवेळी आमदारांपाठोपाठ आता खासदारही बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही खासदारांनी आधीच बंडखोरीचा सुर आळवायला सुरुवात केली आहे. आमदारांपाठोपाठ खासदारांनी पक्षापासून फारकत घेतली, तर एकनाथ शिंदे यांचा शिवसेना दावा बळकट होऊ शकतो. ही लढत दीर्घकाळ होणार हे सर्वांना माहीत आहे. तरी हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघेही जास्तीत जास्त शिवसैनिकांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.