साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे परिसरातील आदिवासी वस्ती येथील रहिवाशांनी उघड्या गटार, नाल्याची तक्रार केली होती. परंतु, आत्ताच तर केले काम, वीस-पंचवीस दिवस झाल्याचे अधिकारी फोनवरती बोलून मोकळे झाले. आधीच नाल्याच्या पाण्याचा त्रास आणि त्यात ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक यांचा होणारा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासोबतच रात्री पथदिवेही बंदावस्थेत राहत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे संबंधितांनी या समस्यांकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
पिंपळेमधून शिरसाळेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने असलेल्या गटारींवर झाकण नाही. अनेकदा त्यातील घाण पाणी शेजारील घरांमध्ये शिरते. घाणीमुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे परिसरात अनेक नागरिक आजारी पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सण-उत्सवात रात्री पथदिवे बंद असल्याने परिसरात काळोख पसरला आहे. त्याचा लहान मुलांसह वयोवृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे.