सीमा देव यांनी सांगितले ५० वर्षांच्या सुखी सहजीवनाचे खास सीक्रेट

0
2

मुंबई :

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं २४ ऑगस्ट रोजी पहाटे निधन झालं. वांद्य्रातील त्यांच्या राहत्या घरी वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव आणि सीमा देव हे सिनेसृष्टीतील गाजलेलं नाव होतं. या दोघांनी एकत्र सिनेमे करत इंडस्ट्री गाजवली, तसंच त्यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांना शेवटपर्यंत साथ दिली. २०१३ मध्ये सीमा आणि रमेश देव यांनी त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा केला होता.

सीमा देव यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी दोघांच्या आयुष्याबाबत काही गोष्टी शेअर केल्या होत्या. सीमा त्यांनी त्यांच्या ५० वर्षांच्या सहजीवनाचं रहस्य सांगितलं होतं. सीमा यांनी लग्नाच्या ५० वर्षाच्या प्रवासाबाबत बोलताना सांगितलं, की लग्न झाल्यानंतर ५० वर्ष कशी गेली हे कळलंच नाही. ठरवून कोणत्याच गोष्टी केल्या गेल्या नव्हत्या. आम्ही दोघंही सारख्याच क्षेत्रातील असल्याने कोणत्या अडचणी येऊ शकतील, त्याला कसं तोंड द्यायचं याचा विचार आधीच करुन ठेवला होता.

त्यामुळेच आम्ही ५० वर्ष गाठू शकलो…

आम्ही दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगला जात होतो. आपापल्या कामासाठी आम्ही वेगवेगळ्या अभिनेते-अभिनेत्रींसोबत काम करत होतो. हे सगळं विश्वास असल्याशिवाय होत नाही. आम्ही दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवला. त्यांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. आम्ही जरी लव्ह सीन करत असलो तरी तो पडद्यावरचा लव्ह सीन आहे, खऱ्या जीवनातील नाही हे समजून घेऊन एकमेकांवर विश्वास ठेवला. विश्वास संसारात खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांवर विश्वास ठेवला त्यामुळेच आम्ही ५० वर्ष गाठू शकलो असं सीमा देव म्हणाल्या होत्या.

दोघांच्या लग्नासाठी रमेश देव यांच्या आईचा होता पाठिंबा

रमेश देव हे मूळचे कोल्हापुरचे होते. त्यांचं कुटुंब उच्चशिक्षित होतं. अशावेळी त्या काळात सिनेमातील मुलगी आपली पत्नी म्हणून तिला घरात आणायचं हे रमेश देव यांच्यासाठी सोपं नव्हतं. पण त्यांच्या आईचा त्यांना पाठिंबा होता.

दोघांच्या लग्नाची आठवण सांगताना रमेश देव म्हणाले, की आमचे एकमेकांवर प्रेम होतं. आम्ही दोघांनी मनापासून लग्न करण्याचं ठरवलं होतं. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं नाही हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं. एक दिवस सीमा यांना रमेश देव त्यांच्या घरी घेऊन गेले होते. त्यावेळी सीमा, रमेश देव यांच्या आईला भेटल्या. पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईने त्यांना ही मुलगी सून म्हणून पसंत असल्याचं म्हटलं होतं.

लग्नानंतर कोल्हापुरातून मुंबईत आले

लग्नानंतर रमेश देव आणि सीमा देव कोल्हापुरातून मुंबईत आले. सीमा देव यांना रमेश यांनी हिंदीतही काम करावं अशी इच्छा होती. त्यामुळेच ते मुंबईत आले आणि हिंदीतही त्यांनी सिनेमात काम केलं. लग्नानंतर रमेश देव हिंदी सिनेमात साइड रोल करत होते. पण अजिंक्यचा जन्म झाला आणि त्यानंतर रमेश देव यांना पहिला मोठा सिनेमा मिळाला होता. त्यांनी अनेक सिनेमांत भूमिका साकारत सिनेसृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here