साईमत, धुळे : प्रतिनिधी
शिंदखेडा तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. उन्हाचा प्रकोप वाढल्याने पीक करपत आहे. त्यानंतरही शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने व्यथित झालेल्या होळ येथील शेतकऱ्याने सहा एकर कपाशीच्या शेतात म्हशी सोडल्या. तसेच रोटाव्हेटर फिरविला.
शिंदखेडा तालुक्यात गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. यंदाही अपेक्षित पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर पेरण्या केल्या होत्या. पण ऑगस्ट महिन्यात पाऊसच झाला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पाणीपुरवठ्यासाठी तालुक्यातील २५ गावात विहिरींचे अधिग्रहण झाले आहे. तसेच धावडे गावात टँकर सुरू आहे.
शेतकऱ्यांना मदत करत शासनाने दिलासा द्यावा
दुसरीकडे शासनाने शेतकऱ्यांना अद्यापही मदत केलेली नाही. त्यामुळे होळ येथील योगेश वसंत ठाकरे यांनी खलाणे शिवारातील ६ एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी ३५ हजार रुपये खर्च केले. पण पाऊस नसल्याने कपाशीची वाढ झाली नाही. तसेच आता रोप करपत आहे. त्यानंतरही महसूल, कृषी विभागाने पंचनामे केले नाही. त्यामुळे व्यथित झालेल्या योगेश ठाकरे यांनी सोमवारी शेतात म्हशींना चरण्यासाठी सोडले. तसेच कपाशीची वाढ होण्याची शक्यता नसल्याने शेतात रोटाव्हेटर फिरविला. शासनाने शेतकऱ्यांना मदत करत दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.