मराठी साहित्य संमेलनात आर.डी.कोळी यांच्या ‘सलाम’ पुस्तकाचे प्रकाशन

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

अमळनेरातील नुकत्याच झालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आर. डी. कोळी यांनी संपादित केलेला महाराष्ट्राचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह ‘सलाम’ पुस्तकाचे ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या काव्यसंग्रहात महाराष्ट्रातून प्राप्त झालेल्या कवितांमधून २७ जिल्ह्यातील १०१ नवोदित ते नामवंत कवींच्या कवितांचा समावेश आहे.

हा काव्यसंग्रह राष्ट्रप्रेम, सामाजिक भान व सामाजिक प्रश्‍न मांडणारा आहे, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाला दिलेल्या शुभेच्छा पत्रात व्यक्त केल्या आहेत.तसेच संपादक आर. डी. कोळी यांचे कौतुकही त्यांनी केले आहे. अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना लाभली आहे.

यांची होती उपस्थिती

प्रकाशनावेळी डॉ. प्रभाकर जोशी, नामदेव कोळी, युवराज माळी, प्रा. बी.एन.चौधरी, आर. डी. कोळी, अशोक सोनवणे, डी. बी. जगत्पुरिया, भास्करराव चव्हाण, भाऊसाहेब देशमुख, निवृत्तीनाथ कोळी, डॉ.सदाशिव सूर्यवंशी, गोकुळ बागुल, पुष्पलता कोळी, डॉ. गणेश जैस्वाल, गोविंद पाटील, किशोर पाटील, वर्षा अहिरराव, अलका पितृभक्त, विशाखा देशमुख, पुष्पा साळवे, कुणाल पवार यांच्यासह साहित्यिक, साहित्य रसिकही उपस्थित होते.

अल्पावधित ‘सलाम’ पुस्तकाने साहित्य विश्‍वाचे लक्ष वेधले असून लवकरच दुसरी आवृत्ती प्रकाशित होईल. उल्लेखनीय म्हणजे लेखक आर. डी. कोळी यांनी स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित केले असून पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम समाजकार्यासाठी वापरण्यात येणार आहे. समाज चिंतामणी प्रतिष्ठान साहित्यिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रमही राबवित आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या ज्ञात-अज्ञात देशभक्तांना ‘सलाम’ समर्पित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here