साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील कळमसरे येथून जवळील पाडळसरे येथे शुक्रवारी, २ फेब्रुवारी रोजी सालाबादप्रमाणे यावर्षीही मरिआईचा यात्रोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. पाडळसरे येथे अनेक वर्षापासून मरिआईची यात्रा भरावयास प्रारंभ झाला. येथील माजी उपसरपंच भीला साळुंखे आणि ग्रामस्थांच्या मदतीने यात्रा भरावयास सुरुवात केली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पाडळसरेचे नवीन पुनर्वसन म्हणून समायोजन झाले आहे. तापी नदी काठावर वसलेले नाटेश्वर महादेव मंदिर आणि गावात असलेले मरीआई मातेचे मंदिर याच जुन्या गावी स्थित असल्यामुळे आजही यात्रा याच ठिकाणी होत असते, हे विशेष.
गावातील इडा, पीडा दूर सारणाऱ्या मरीआईच्या यात्रोत्सवात गावातील महिला, अबालवृद्ध स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात. गावासह परिसरातील श्रोते यांच्या लोकमनोरंजनासाठी सुकलाल भाऊ बोराडीकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. यात्रोत्सव काळात हॉटेल्स, झुले पाळणे, खेळणीची दुकाने, गृहोपयोगी साहित्याची दुकाने दुकानदारांनी थाटावी. तसेच यात्रा काळात शांतता राखावी, असे आवाहन पाडळसरे ग्रामपंचायतीच्यावतीने केले आहे.