जि.प.सीईओंची माहिती, जामनेर तालुक्यातील हिवरखेड्यात मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जिल्ह्यातील ग्रामपंचायती पूर्णपणे सक्षम आणि समृद्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मीनल करनवाल यांनी एक महत्त्वाकांक्षी ‘पंचायत सक्षमीकरण अभियान’ सुरू केले आहे. अभियानाची औपचारिक घोषणा सोमवारी, १९ मे रोजी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास व उत्पन्न वाढ घटकांतर्गत आयोजित सोलर ड्रायिंग प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेतील इतर महत्त्वपूर्ण अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत मीनल करनवाल यांनी अभियानाची माहिती दिली. त्याचे महत्त्व विशद केले.
‘पंचायत सक्षमीकरण अभियाना’अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील तब्बल ३०० ग्रामपंचायतींची निवड केली आहे. अशा निवडलेल्या ग्रामपंचायतींना प्रशासकीय, आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम बनविण्याचा निर्धार जिल्हा परिषदेने केला आहे. अशा ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजना आणि नियमांनुसार १ ते १४ नमुन्यांचे अद्ययावत संकलन केले जाईल. तसेच प्रत्येक गावासाठी नियोजनबद्ध विकास आराखडे तयार करण्यात येतील. त्याव्यतिरिक्त ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहे. शाश्वत विकासाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
ग्रामीण भागाच्या विकासाला
नवी दिशा मिळणार
जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल म्हणाल्या की, जर आपले गाव समृद्ध झाले, तर निश्चितच जिल्ह्याची प्रगती होईल. ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण केवळ कागदावरचे आकडे किंवा योजना नाही. प्रत्यक्ष कृतीद्वारे गावांचा सर्वांगीण आणि समतोल विकास घडवून आणण्याचे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. अशा महत्त्वाकांक्षी उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी संबंधित पंचायत समित्या, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि स्थानिक नागरिकांचे सक्रिय सहकार्य घेतले जाणार आहे. अशा सामूहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील गावागावांमध्ये विकासाभिमुख सकारात्मक वातावरण तयार होईल, असा विश्वास सीईओ करनवाल यांनी व्यक्त केला. अभियानाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.