वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी महापालिका–पोलीस प्रशासनाची संयुक्त मोहीम; तीन दिवसांत मोठी कारवाई
साईमत जळगाव प्रतिनिधी
शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवरील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या गंभीर वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या मोहिमेचे सविस्तर नियोजन करण्यात आले.
या बैठकीला स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा तसेच ‘NHAI’चे राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर उपस्थित होते.
महामार्गावरील नेरी नाका ते अजिंठा चौक, अजिंठा चौक ते खेडी, अजिंठा चौक ते कुसुंबा आणि खेडी ते खोटेनगर या मार्गांवरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः अजिंठा चौक परिसरातील अनेक वर्षांपासून सुरू असलेला भंगार बाजार वाहतुकीस मोठा अडथळा ठरत असून, पुढील तीन दिवसांत येथे मोठी कारवाई राबवली जाणार आहे. या कारवाईदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष मोहीमही हाती घेण्यात आली आहे. शहरात ९५ अधिकृत रिक्षा थांबे असतानाही अनेक रिक्षाचालक रस्त्यातच वाहने उभी करत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. अशा बेशिस्त चालकांवर पुढील आठ दिवसांत कठोर कारवाई करण्यात येणार असून, त्यापूर्वी त्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या जाणार आहेत.
तसेच बाजारपेठांमधील अनियंत्रित पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी टोईंग कारवाईचेही नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या कारवाईच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, अतिक्रमणमुक्त आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
