जळगाव हादरले भोंदूबाबा आणि पोलीस पत्नीचा अघोरी पूजेच्या नावाखाली ११ लाखांचा गंडा साडेतीन वर्षांनंतरही आरोपी फरार
साईमत जळगाव प्रतिनिधी
जळगाव शहरात अघोरी विद्या, करणी-बाधा दूर करण्याचे तसेच गुप्तधन मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिला ग्राफिक डिझायनरची तब्बल ११ ते १२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील विशेष गंभीर बाब म्हणजे आरोपींमध्ये एका भोंदू बाबासोबतच त्याची पोलीस दलात कार्यरत असलेली पत्नीही सहभागी असल्याचे समोर आले आहे. गुन्हा दाखल होऊन साडेतीन वर्षे उलटली तरी आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने थेट जळगाव पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी महिला पोलीस कर्मचारी महिमा उर्फ मनोरमा पाटील या कॉलेजपासूनच्या मैत्रिणी होत्या. या मैत्रीचा फायदा घेत महिमा पाटील हिने पीडितेच्या घरातील वैवाहिक वादांचा मुद्दा पुढे करत आपला पती ललित पाटील याच्याकडे अलौकिक शक्ती असल्याचे भासवले. “तो घरातील सर्व समस्या सोडवून सुख-शांती आणेल,” असे सांगत तिने पीडितेला विश्वासात घेतले.
त्यानंतर भोंदू बाबा ललित पाटील याने पीडित महिलेच्या मनात भीती निर्माण करण्यास सुरुवात केली. “तुझ्या घरात दिराच्या आत्म्याचा प्रवेश झाला आहे, तुझ्यावर करणी करण्यात आली आहे,” असे सांगून त्याने विविध अघोरी विधी सुरू केले. हा फसवणुकीचा प्रकार केवळ जळगावपुरता मर्यादित न राहता आरोपींनी पीडित कुटुंबाला देशातील विविध धार्मिक ठिकाणी नेऊन बनावट पूजा केल्या. तनोट माता मंदिर, उज्जैन, गोगामेडी, पुष्कर, अजमेर आणि ओंकारेश्वर येथे या तथाकथित विधींच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले. उज्जैन येथे स्मशानभूमीतही अघोरी विधी करून पीडितेकडून लाखो रुपये घेतले गेले.
या संपूर्ण काळात पीडितेने कर्ज काढून सुमारे ११ ते १२ लाख रुपये रोख तसेच ऑनलाईन स्वरूपात आरोपींना दिले. मात्र कोणताही परिणाम दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ललित पाटील याने “मी अघोरी आहे, पैसे मागितले तर तुझ्या सात पिढ्यांचा नाश करेन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी महिमा पाटील ही मुंबईतील भांडुप परिसरात कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे शोधमोहीम राबवली होती. मात्र ती सापडू शकली नाही. तब्बल साडेतीन वर्षे उलटूनही दोन्ही आरोपी फरार असल्याने तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
“आरोपी पोलीस दलातील असल्यामुळेच तपासात दिरंगाई होत आहे,” असा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे. आपली फसवणूक झालेली रक्कम परत मिळावी आणि आरोपींना तात्काळ अटक व्हावी, या मागणीसाठी तिने आता पोलीस अधीक्षकांचे दरवाजे ठोठावले आहेत.
या घटनेमुळे जळगाव शहरासह पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, तपासाची गती वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
