साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी येथे स्वच्छता मोहिमेत थेट घंटागाडीत सवारी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सोबतच स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर येथे भेट दिली. भेटीत त्यांनी शहरामध्ये स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत स्वत: सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यासोबत स्वतः साफसफाई केली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांनी स्वत: कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीत बसून संपूर्ण माहिती जाणून घेतली. थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच घंटागाडीत बसलेले पाहून अनेकांना धक्का बसला. त्यांनी घंटागाडीमध्ये बसून जामनेर शहरांमधील स्वच्छतेची पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील कामे हे आयुष प्रसाद यांनी गतीमान आणि सुटसुटीत केली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामांना गती मिळालेली आहे. एकीकडे कार्यालयीन कामांमध्ये सुधारणा करतांनाच त्यांनी ठिकठिकाणच्या भेटीतून आपला ॲक्शन मोड दाखवून दिला आहे. अलीकडेच रावेर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्तांना स्वत: मैदानावर उतरून मोठा दिलासा दिला होता. यानंतर त्यांनी जामनेर येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन प्रशासन हे किती चांगल्या प्रकारे लोकाभिमुख प्रकारे काम करू शकते हे दाखवून दिले आहे. जामनेर दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपालिका व अधिकाऱ्यांना स्वच्छतेबाबत विविध प्रकारच्या सूचना दिल्या. तसेच स्वच्छता मोहिमेत त्यांनी स्वत: सहभागी होत कचरा संकलन केले. जामनेर शहरातील नगरपालिका स्वच्छ व सुंदर होऊन देशांमध्ये राष्ट्रपती यांच्या असे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आपण प्रयत्न करावा, असे आव्हाने केले.
तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठका
यावेळी जामनेर तहसील कार्यालयात विविध अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन जलयुक्त शिवार योजनेतील गावे गाळमुक्त धरण व जलजीवन मिशनची कामे पूर्ण करा, शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढून त्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी, कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. यावेळी प्रांताधिकारी महेश सुधाळकर, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.