शहरवासियांमधून उमटला संताप, नागरिकांची उडाली धांदल ; रस्त्यावर झाडे उन्मळून पडली
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
शहरात मंगळवारी, ६ मे रोजी दुपारी अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. वादळ, वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. अशातच वादळी वाऱ्यासह पावसामुळे जळगाव शहरातील वीज तब्बल आठ तासांच्यावर गुल झाल्याने शहरवासियांना अंधाऱ्याचा सामना करण्याची वेळ आली होती. तसेच एमआयडीसी विभागालाही वीज गुल झाल्याचा फटका बसला होता. कंपनीत जाणाऱ्या कामगारांनाही अंधाऱ्याचा सामना करुन कामाच्यास्थळी पोहोचावे लागले. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी, वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. आगामी महिन्यात येणाऱ्या वरुणराजाची हजेरी मे महिन्यातच लागली आहे. त्यामुळे वीज पुरवठा करण्यासंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा शहरवासियांनी व्यक्त केली आहे.
शहरातील बहुतांश भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पावसाचे दुपारच्या सुमारास आगमन झाले होते. त्यामुळे जवळपास दुपारी तीन वाजेपासून शहरातील वीज पुरवठा खंडीत होऊन रात्री नऊ वाजेपर्यंतही वीज पुरवठा सुरु झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांसह महिलांनी महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. अनेकांच्या घरात वीज नसल्याअभावी त्यांना अंधाऱ्याचा सामना करावा लागला. अवकाळी पाऊस झाल्याने घरातील अबालवृद्धांसह अनेकांना उकाडा असह्य झाला होता.
एमआयडीसीतील कामगारांचा संताप
दुसरीकडे जळगाव शहरातील एमआयडीसीच्या भागातही उशिरापर्यंत वीज गुल झाली होती. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अंधारातून पायवाट काढावी लागल्याची स्थिती होती. एमआयडीसीत कामावर जाणाऱ्या कामगारांनीही महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
विकासाच्या गप्पांना अर्थ नाही
विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनीही शहरात वीज गुल होत असेल तर अशा गप्पांना काहीच महत्त्व नाही, असा चर्चेचा सूरही संतप्त शहरवासियांमधून उमटला. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याआधीच महावितरणकडून वीज पुरवठा खंडीत झाल्यास याला म्हणावे तरी काय ? असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. त्यामुळे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रियाही संतप्त शहरवासियांमधून उमटल्या आहेत.