आघाडीमुळे इंडिया नाव पुसण्याचा घाबरटपणा

0
2

साईमत, मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ‌‘इंडिया‌’ नावाचा वापर टाळला जात आहे. त्यावर सडकून टीका केली. देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचे नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही, असे म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. संजय राऊत म्हणाले, आम्ही ‌‘इंडिया‌’ आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया या शब्दाचंच भय वाटायला लागलं. एखाद्या पक्षाला, एखाद्या सरकारला देशाच्या घटनेतील नावाविषयी भय वाटू लागतं हा विचित्र प्रकार आहे. घटनेत इंडिया नाव आहे. घटनेत भारत हेही नाव आहे. मात्र, देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचं नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही.

भाजपा रिपब्लिक ऑफ भारत लिहितात. खरंतर यांनी ‌‘नया भारत‌’ निर्माण करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांनी आता रिपब्लिक ऑफ नया भारत म्हणायला हवं. या भारताशी, इंडियाशी भाजपाचा संबंध नाही. हे कोणत्या ग्रहावरून काम करत आहेत. हे चांद्रयानात बसून चंद्रावर जाऊन काम करत आहेत का?” असा प्रश्न संजय राऊतांनी विचारला. संजय राऊतांनी इंडिया आहे आणि इंडिया राहील, असं म्हटलं. तसेच इंडिया भविष्यात सत्तेतही येईल, असा विश्वास व्यक्त केला. याव्ोळी राऊतांनी एक देश, एक निवडणुकीवरही सडकून टीका केली आणि ही कल्पना म्हणजे देशातील एक फ्रॉड असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here