साईमत, बोदवड : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात दुष्काळ असतानाही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बहुसंख्य शेतकरी सभासदांनी मार्च २०२४ अखेर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसताना बाहेरून व्याजाचे पैसे काढून सोसायटीचे कर्ज फेडले. सोसायटीच्या सचिवांनी जिवाचे रान करून जास्तीत जास्त वसूली केली. सभासदांना आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत कर्ज मिळेल, असे आश्वासन सचिवांनी दिलेले असताना आता बँकेने कर्ज वाटपाच्या धोरणात बदल केला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना विकासोमार्फतच कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.
बँकेकडूनच शेतकरी सभासदांना कर्ज दिले जाणार असल्याने शेतकरी संभ्रमात सापडला. जिल्हा बँक शाखा बोदवड येथे शेतकरी वणवण फिरत आहे. जिल्ह्यातील २९१ सोसायट्यांमध्ये बोदवड तालुक्यातील २९ संस्था अनिष्ट तफावतीत आहे. म्हणजे ५० लाखांवरील असल्याने ह्या सोसायटीमार्फत कर्ज वाटप होणार नाही. अशा परिस्थितीत शेतकरी संकटात सापडला आहे. बँकेने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
यंदा निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्न झिरो टक्के आहे. ज्यात ज्याच्याकडून अपेक्षा होती. विकासोसायटीमधून कर्ज मिळणार नसल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीचा प्रत्यय येतो आहे. बँकांनी विश्वासात घेऊन सोसायटीकडून कर्ज वसुली करून घेतली. कर्ज वसुलीपूर्वी बँकेने विकासो संस्थामार्फत कर्ज वाटप करण्यात येईल, असे वारंवार सांगितले. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची असून शेतकरी हिताचे निर्णय घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.