कृषी विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
साईमत/जामनेर/प्रतिनिधी :
येथील पंचायत समितीच्या सभागृहात कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामपूर्व कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नाशिक विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर होते. कार्यशाळेत कृषी विभागाचे सुनील गायकवाड, अकिल तडवी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया आणि बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके करून दाखवली.
सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा आत्मा आहे. तो टिकविण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन द्यावे. तसेच बीज प्रक्रियेचे महत्व नमूद करताना बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन संभाजी ठाकूर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी ढेपले यांनी बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी. तसेच प्रतिबंधित एचटीबीटी वाण वापरु नका, असे शेतकऱ्यांना आवाहन केले.
कार्यशाळेला उपस्थित मार्गदर्शक जळगाव कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी यांनी उंच सरी व वरंबा (बीबीएफ) पद्धतीच्या पेरणी यंत्राने पेरणी केल्याने होणारे फायदे आणि उत्पादन वाढ याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पाल कृषी विज्ञान केंद्राचे अतुल पाटील यांनी तालुक्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादन वाढीचे सूत्र शेतकऱ्यांना समजावून सांगितले. सिजेंटा कंपनीचे अमित लाहोरे यांनी मका पिकावरील उशिरा येणारा मर रोगाविषयी माहिती दिली. कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी रवींद्र महाजन, यांनी फळबाग लागवडबद्दल मार्गदर्शन केले. तालुक्यातील नैसर्गिक शेतीचे प्रणेते संग्राम राजपूत यांनी नैसर्गिक शेती करण्याची आवश्यकता, त्याचे फायदे, जीवामृत, बिजामृत आणि निंबोळी अर्क तयार करून त्याचा वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन केले.
यांची लाभली उपस्थिती
कार्यशाळेला कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांनी कृषी विभागाची खरीप नियोजनाची रूपरेषा मांडली. सूत्रसंचलन कृषी पर्यवेक्षक प्रदीप पाटील तर राकेश पाटील यांनी आभार मानले.