साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. यापार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहे. आगामी निवडणुकीच्या (Election) दृष्टीने ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत. कालपासून (31 ऑक्टोबर) मातोश्रीवर मॅरेथॉन बैठकांना ठाकरेंनी सुरुवात केली आहे. यात आजी माजी खासदारांसह स्थानिक जिल्हाप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. दरम्यान, या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळावा घेणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून ठाकरे शिंदे सरकारला घेरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या आधी उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरपासून 14 नोव्हेंबरपर्यंत मातोश्री निवासस्थानी बैठकांचं सत्र पार पडणार आहे. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात येणार आहे. येत्या काळातील मित्र पक्षांसोबतच्या युतीबाबत या बैठकांनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे होरपळला आहे. यातूनही काही शेतकऱ्यांनी त्यांची पिकं वाचवली होती. मात्र, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेतले आहे. त्यामुळ शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.नुकताच 23 ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी यावेळी ठाकरेंनी केली होती. तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते.