साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने मोठा खंड दिला आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच सरकारद्वारे पहिल्या टप्प्यात चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ योजना जाहीर केली होती. त्यानंतर पुन्हा निकर्षात मोठा बदल करून ९५९ महसूल मंडळांचा समावेश दुष्काळात केला आहे. त्यामुळे दुष्काळी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यानुसार आ.चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याने मतदार संघातील रावेर, बोदवड व मुक्ताईनगर या तीनही तालुक्यातील सुमारे १० महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. त्यात केवळ कुऱ्हा मंडळ सुटलेले असून या महसूली मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे आ.चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील १० महसूल मंडळांमध्ये खिर्डी बु., ता.रावेर, निंभोरा बु., ता.रावेर, मुक्ताईनगर, ता.मुक्ताईनगर, अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर, घोडसगाव, ता.मुक्ताईनगर, बोदवड, ता.बोदवड, करंजी, ता.बोदवड, सावदा, ता.रावेर, ऐनपूर, ता.रावेर, नाडगाव, ता.बोदवड अशा मंडळांचा समावेश आहे.
ऐनपूर महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी आ.चंद्रकांत पाटलांचे मानले आभार
गेल्या ३० ते ४० वर्षात अस्मानी व तुफानी सुलतानी संकटे झेलून रावेर तालुक्यातील ऐनपूर महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर होत नव्हती. यंदा आ.चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने इतिहासात पहिल्यांदा नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळ महसूल मंडळांच्या यादीत तसेच शासनाच्या परिपत्रकात ऐनपूर महसूली मंडळाचा समावेश झाला आहे. आता या महसूली मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानी खऱ्या अर्थाने अनुदान व इतर मदतीचे लाभ घेता येणार आहे.
त्यात जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे असा लाभ मिळणार आहे. वरील सर्व तालुक्यातील महसूल मंडळांचा नव्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये समावेश केलेला आहे.