साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात सरासरीपेक्षा किती तरी पट कमी पाऊस झाला आहे. पाण्याअभावी पिके करपली आहेत. पाऊस उशिराने आला तरी पिकांचे नुकसान भरुन निघणार नाही. मागील वर्षाचा कापसाचा निच्चांक दर व घरात पडून असलेला कापूस इतर धान्य, कडधान्य यांना मिळणारा तुटपुंजा भाव, भाजीपाल्याच्या भावात अस्थिरता एकूणच सर्व प्रकार शेतकऱ्यांच्या जीवनात रौद्ररुप घेऊन आलेला आहे. पिक विम्याच्या निकषाची ९ पैकी ३ मंडळे घोषित झाली आहेत. यासंदर्भात तातडीने लक्ष घालून दुष्काळ जाहीर करत त्या संदर्भाची अनुदाने पिकविम्यासाठीचे पंचनामे, गुरांच्या छावण्या, पिण्याच्या पाण्याचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्ष तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल, त्याच्या होणाऱ्या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असे चाळीसगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना तालुक्याचे माजी आमदार राजीव देशमुख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किसनराव जोर्वेकर, दिनेश पाटील, कैलास सूर्यवंशी, प्रमोद पाटील, श्याम देशमुख, भगवान पाटील, अजय पाटील, ईश्वर ठाकरे, शशिकांत साळुंखे, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष नाना कुमावत, महेंद्र पाटील, निलेश गायके, राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.