साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षांपूर्वी तांबोळे गावाकडे जाणाऱ्या तितुर नदीवरील पूल ‘धोकेदायक पूल’ म्हणून जाहीर करा, अशा ठळक मथळ्याखाली बातमी दैनिक ‘साईमत’मध्ये प्रकाशित केली होती. त्यानंतर यासाठी आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येऊन पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू होते. पावसाळ्यापूर्वी पुलावरून जाण्या-येण्याचा मार्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल आ.मंगेश चव्हाण, दैनिक साईमत यांच्यासह विशाल धनगर यांचे परिसरातील सर्व ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
तालुक्यातील तांबोळी बु., खु. चितेगाव, पिंप्री, गणेशपूर, ओढरे, शिंदी, जुनपाणी या गावातील रहिवासी आणि महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. या भागातील नागरिकांचा दळणवळणाचा मुख्य रस्ता तांबोळे गावाजवळील तितूर नदीवरील पूल त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यावेळी धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष विशाल धनगर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे नवीन पुलासंदर्भात मागणी केली होती. अनेक पाठपुरावा केले होते. विशाल धनगर यांच्यासह ग्रामस्थांनी आ.मंगेश चव्हाण यांच्याकडे साकडे घातले होते.