साईमत लाईव्ह भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. देशभरातील सर्वच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गापैकी एक असलेलं हे जंक्शन असल्याने येथून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ सुरू असते. यात अनेकदा गंभीर गुन्ह्यातील आरोपी तसेच प्रवासा दरम्यान गंभीर गुन्हेही घडत असतात. अशीच एक घटना उघडकीस आली असून खंडव्याकडे जाणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमृतसर येथील तरुण मनमीत सिंग गुरुप्रितसिंग हा 26 ऑक्टोंबर रोजी आपल्या चार – पाच मित्रांसोबत नांदेड – अमृतसर या एक्स्प्रेस गाडीने अमृतसरकडे निघाला होता. प्रवासा दरम्यान त्याचे मित्रांसोबत वाद झाल्याचे समजते. हा वाद विकोपाला जात हाणामारीत रूपांतरीत झाला. व या हाणामारीत मित्रांकडून मनमितसिंग याचा गळा चिरला गेला. त्यानंतर प्रवासा दरम्यानच मित्रांनी भुसावळकडून खंडव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे यॉर्डात मनमीतचा मृतदेह फेकून दिला असावा, असा दाट संशय व्यक्त केला जात असून याबाबत मृतक मनमितसींग याच्या भावाच्या फिर्यादीवरून त्या चार ते पाच मित्रांविरूध्द भुसावळ येथील रेल्वे पोलिस स्थानकात (जीआरपी) रितसर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर वाद नेमका कशामुळे झाला याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.