साईमत लाईव्ह उस्मानाबाद प्रतिनिधी
सर्वसाधारण शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पादन घेतले. परिसरात एकरी सरासरी ७० ते ७५ टन उत्पादन घेतले जाते. पण या सरासरीच्या गणिताला बगल देत चिंचोली भुयार, ता. उमरगा येथील प्रयोगशील शेतकरी अमर पवार यांनी एक एकर शेतात तब्बल १०४ टन ऊसाचे उत्पन्न घेतले. अमर पवार यांना वडिलोपार्जित २० एकर शेती असून शेतीकडे लक्ष देण्यासाठी त्यांनी वकिली व्यवसायाला राम-राम ठोकत शेत व्यवसाय करण्याचा छंद बांधला.
या वर्षी साखर कारखान्याचे बायलर पेटल्यानंतर ऊसतोड सुरू झाली आणि अमर पवार यांनी एकरी १०४ टन ऊस काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी एकरी ७० ते ७५ टन ऊस उत्पादक काढले जाते. पवार यांनी सरासरी पेक्षा जास्त उत्पादन घेत शतक चा आकडा पार केल्याने शेतकऱ्यांत चर्चा चालू आहे. जेमतेम रासायनिक खत व सेंद्रिय खतांचा मिश्रण करून व ऊसातील तण काढण्यात सातत्य ठेवल्याचे गमक असल्याचे पवार यांनी सांगितले ऊसाला ड्रीपच्या तुटलेल्या नळीचे तोटा बनवून तोट्याच्या सहाय्याने पाणी देण्यात आले आहे. यामुळे योग्य प्रमाणात पाणी पोहचले व श्रम देखील कमी लागले. सन २००० मध्ये शेतकरी अमर पवार यांनी एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ वकिली व्यवसाय केला. काही कारणाने विधी व्यवसायातील आवड कमी झाल्याने ते शेती व्यवसायाकडे वळून अभ्यासपूर्ण शेती व्यवसाय करण्याचा निश्चय केला.