साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
कुस्ती हा महाराष्ट्रातील मातीतला अस्सल रांगडा क्रीडा प्रकार. भारतासाठी पहिल्यांदा ऑलम्पिकमध्ये मिळालेले पदक हे कुस्ती या प्रकारातीलच होते. आणि ते मिळविणारे वीर आपल्या महाराष्ट्रातील खाशाबा जाधव होते. महाराष्ट्रात कुस्ती प्रेमी अनेक नव्या दमाचे तरुण उदयाला येत आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील एक नाव म्हणजे आर्यन शांताराम पाटील आहे.
आर्यन पाटील गुड शेफर्ड शाळेत १० वीमध्ये शिक्षण घेत आहे. जिल्हा स्तरावरील कुस्ती स्पर्धेत ९२ किलो वजन गटात शाळेकडून त्याने कुस्ती खेळली. चाळीसगाव तालुक्यातून ८ विद्यार्थी सहभागी झालेले होते. त्यात जिल्हास्तरावर आर्यन शांताराम पाटील याने ९२ किलो वजनी गटातून बाजी मारत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.