साईमत / डोंबिवली
रस्त्यात गाडी उभी करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. केवळ गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातून तिघांनी मिळून कार चालक आणि त्याच्या मित्रावर दगडांनी प्राणघातक हल्ला केला.
ही घटना डोंबिवली पश्चिमेतील सत्यवान चौक परिसरात घडली. कार चालक अमित पाटील हे आपल्या कारने जात असताना रस्त्यात गप्पा मारण्यासाठी उभ्या असलेल्या तिघांना त्यांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अमित पाटील यांनी दोन ते तीन वेळा हॉर्न वाजवल्यानंतर या तरुणांचा पारा चढला.
संतापाच्या भरात तिघांनी अमित पाटील आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे यांच्यावर अचानक हल्ला चढवला. रस्त्यावरील दगड उचलून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली तसेच कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांपैकी राम्या म्हात्रे आणि सचिन म्हात्रे हे सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. परिसरात त्यांची दहशत असल्याचेही सांगितले जाते.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
