टाकरखेडा–दहिवद रस्त्यावर अपघात पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
साईमत/अमळनेर/ प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील दहिवद गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत एका ४८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विटनेर गावातील रहिवासी पंढरीनाथ विठ्ठल पाटील (वय ४८) हे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथून दहिवद गावाकडे पायी जात होते. दहिवद गावाजवळील रस्त्यावर समोरून येणाऱ्या भरधाव दुचाकी (क्र. एमएच १९ डीझेड १६४०) ने त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात पंढरीनाथ पाटील यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र जखमा गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे विटनेर व दहिवद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शनिवारी (दि. ८) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी सुनील जाधव करीत आहेत.
