धानोऱ्यातील बैठकीत प.पू.जनार्दन हरीजी महाराज यांचे प्रतिपादन
साईमत/धानोरा, ता.चोपडा/प्रतिनिधी
येथे गेल्या रविवारी रात्री ९ वाजता दुर्गोत्सव मिरवणुकीत दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारीसह दगडफेक करण्यात आली होती.त्यात दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले होते. याप्रकरणी परस्परांनी अडावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरुन काहींना अटकही केली आहे. सर्व घटनेनंतर मंगळवारी, दुपारी १ वाजता धानोऱ्यातील संत देवा महाराज भक्त निवासात फैजपुरचे महामंडलेश्वर प. पू. जनार्दन हरीजी महाराज यांनी दोन्ही गटातील लोकांना एकत्रित बोलावून घडलेली घटना दुदैवी आहे. त्यामुळे गावात शांतता राखण्यासाठी सामाजिक एकोपा महत्त्वाचा आहे.
तसेच समाजातील टवाळखोर मुलांना सुधारण्याची गरज आहे. अशा घटनांमुळे समाजाची हानी होते. आम्ही संत मंडळींनी हिंदू धर्मासाठी जीवन अर्पण केले आहे. अशा घटनेमुळे वेदना होतात, असेही बैठकीत ते म्हणाले.
गावात तणावपूर्ण शांतता, चोख पोलीस बंदोबस्त तैनात
याप्रसंगी महाराजांनी तडजोडसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दोन्ही गटाकडून माणिकचंद महाजन आणि चंद्रशेखर साळुंके यांनी यापुढे असा वाद होणार नाही, त्याची समाजातर्फे ग्वाही दिली. यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आज गावात एकही दुकान उघडले नाही. मात्र, गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. बैठकीला पत्रकार प्रशांत चौधरी, प्रशांत सोनवणे, पीक संरक्षण संस्थेचे चेअरमन पन्नालाल पाटील, सतपंथ ज्योत मंदिराचे विजय महाराज आदी उपस्थित होते.