साईमत, अडावद, ता. चोपडा : वार्ताहर
वाढत्या महागाईमुळे लग्न समारंभ दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत आहे. अशातच सर्व रूढी-परंपरांना फाटा देत अडावद येथे अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला. यामुळे नातेवाईकांचा वेळ व पैसा वाचला आहे. त्यामुळे वधु व वरांचे माता-पिता, त्यांचे नातेवाईक खरोखरच कौतुकास्पद पात्र ठरले आहे. त्यांचे कार्य येणाऱ्या काळासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
अडावद येथील रहिवासी शेख एजाजोद्दीन निजामोद्दीन यांची सुकन्या नूजहत जहाँचा साखरपुडा साकळी, ता. यावल येथील रहिवासी कलीम खान अब्दुल्ला खान यांचा सुपुत्र तौसिफ खान याच्याशी बुधवारी, २२ मे रोजी नियोजित होता. म्हणून साखरपुड्याला फारच निवडक लोक कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. जवळीक असलेल्या काहींनी साखरपुड्याच्या कार्यक्रमात लग्नच का करण्यात येऊ नये? असा प्रस्ताव आप्तेष्ट मंडळींसमोर ठेवला. साखरपुड्यातच लग्न लावून देण्याचा प्रस्ताव हा आदर्श विचार असल्याने वधु व वर पक्षातील ज्येष्ठ मंडळींकडून व खासकरून कुटुंबातील सदस्यांकडून लग्नाला होकार मिळाला. अगदी काही तासतच साध्या पद्धतीने नूजहतजहां आणि तौसिफ खानचा विवाह सोहळा पार पडला.
साखरपुड्यात लग्न लावून देण्यासाठी शकील मेंबर, शेख सलीम जहागीरदार, अमिनोद्दीन शमसोद्दीन, फारूकअली रौशनअली, रसूल खान, इस्माईल खान, मुद्दसर खान, रिजवन खान, असलम यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.



