एलएलबीच्या विद्यार्थ्यांचे स्वखर्चाने स्वयंप्रेरित अनोखे मतदार जागृती अभियान

0
43

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील उल्हास पाटील विधी महाविद्यालयातील प्रथम वर्षातील एलएलबीच्या विद्यार्थ्यांनी एका कारवर रंगीबेरंगी स्वरूपात शत प्रतिशत ‘मतदान-देश का सन्मान’, ‘ना नशे से, ना नोट से, देश की किस्मत बदलेगी तो वोट से’, ‘वोट करो भाई वोट करो’, सीमापार दुश्‍मन पर चोट करो’, ‘कामाला लागा-मतदान करा’, ‘लग्न टाळा, साखरपुडा टाळा, आळस टाळा, मतदान करा’, ‘खुद मतदान करो, औरों से मतदान कराओ’, ‘मतदान म्हणजे राष्ट्रसेवा’, ‘मतदान म्हणजे समाजसेवा’ अशा विविध घोषणांचे स्टिकर चिटकवून मतदान जनजागृती रथ सजविला आहे. या रथावर एक ध्वनीक्षेपक(स्पीकर) बसविलेला आहे. १५ एप्रिलपासून दररोज साधारण १० गावांतील चौकाचौकात आणि गल्लीगल्लीत जाऊन रथ मतदार जागृती करीत आहे. हा रंगीत संगीत रथ जिथे जाईल तिथे नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वखर्चाने व स्वयंप्रेरणेने सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निवडणूक अधिकारी प्रमोद हिले यांच्या संकल्पनेतून खान्देशातील कवी मनोहर आंधळे यांनी रचलेले व नायब तहसीलदार प्राजक्ता केदार यांनी गायिलेले मतदार जागृती गीत गावोगावी ऐकविले जाते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार व जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने वंचित पाडे, तांडे येथे जनजागृती रथाची यात्रा सुरू आहे. यापूर्वी जिल्ह्यातील १५० पेक्षा अधिक गावांमध्ये रथाने जनजागृती केली आहे. जाईल तेथे हा मतदान जनजागृती रथ आकर्षण ठरत आहे. नागरिक उत्सुकतेने विविध घोषवाक्य वाचत व ऐकत आहेत. जनजागृतीद्वारे प्रत्येकाने स्वत: मतदान करावे, इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करावे, असे वारंवार प्रेरीत केले जात आहे.

विधी महाविद्यालयाचे रावसाहेब राऊळ यांच्या नेतृत्वाखाली भरत ससाणे, अक्षय रिठे, आनंद पाटील या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या नयना झोपे (महाजन), अनुजा पाटील, पूजा व्यास, विद्या बोरनारे, ऐश्‍वर्या आठवले, शैलेष नागला या प्राध्यापकांचे व विनोद धांडे, प्रदीप महाजन या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन तसेच इतरही काही मित्र मंडळींचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here