पीक विम्यासाठी तालुक्यातील सर्वच विमाधारक शेतकरी पात्र

0
33

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील सर्व कृषी मंडळातील (बहाळ, चाळीसगाव, हाताले, खडकी, मेहुणबारे, शिरसगाव, तळेगाव) प्रत्येक विमाधारक शेतकरी विमा मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत. शेतकऱ्यांना पिकविम्यामधील २५ टक्के आगाऊ रक्कम तातडीने अदा करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमा कंपन्यांना दिले आहे. त्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे.

चाळीसगाव तालुका यावर्षी अभूतपूर्व अशा दुष्काळाला सामोरे जात आहे. असे असताना केवळ विमा परतावासाठी केवळ तीन कृषी मंडळ पात्र धरण्यात आली होती. यावेळी चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना विमा परतावा मिळाला पाहिजे, याविषयी पाठपुरावा सुरू केला. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तब्बल ३१ दिवस पावसाचा खंड हा निकष धरून पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी कृषी विभागाकडे लावून धरली. केवळ मागणी न करता सर्व मंडळ पीकविमास पात्र कसे आहेत, हे पुराव्यांशी सांगितले. तालुका कृषी अधिकारी आणि टीमने सर्व्हे करत सर्व कृषी मंडळाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

यानंतर चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संपर्क साधुन तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पात्र शेतकऱ्यांना विमा मिळेल, असे आश्वासन दिले होते. पीक विमा नुकसान भरपाईबाबत कपाशीच्या समावेशाला अडचणी येत असल्याचे लक्षात येताच चाळीसगाव विकास मंचचे प्रफुल्ल साळुंखे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली. तालुक्यातील सर्व मंडळात ३१ दिवसांचा पावसाचा खंड, ५० टक्क्यांपेक्षा कमी आणेवारी, नदी नाले कोरडे, अशा सर्व निकषात तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होतो. त्यामुळे खरिपाच्या सर्वच प्रकारच्या पिकांना पिकविमा नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली. यासंदर्भात कृषीमंत्री यांनी तात्काळ त्याची दखल घेत संपूर्ण तालुका मंडळाचा समावेश करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्वच्या सर्व मंडळातील सर्वच पिकांना पिक विमा लागू करण्यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. त्या अनुषंगाने विमाची २५ टक्के आगाऊ रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आदेश विमा कंपन्याना दिले आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील तब्बल ७७ हजार शेतकऱ्यांची ‘दिवाळी’ काहीशी गोड होणार आहे.

‘विकास मंच’चा पाठपुरावा अजूनही सुरूच

तालुक्यात अभूतपूर्व दुष्काळ आहे. पावसाचा खंड, उष्ण हवामान, जमिनीत पाणी नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. तालुक्यात अंदाजे ६० गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. ही सर्व परिस्थिती पाहता तालुक्याला ट्रिगर २ लागू करावा. ट्रीगर २ अंतर्गत तालुक्यातील फळबागांनाही पीक विमाची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी आहे. मुलासारख्या जपलेल्या फळबागा सुकण्याच्या अवस्थेत आहेत. फळपिकाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी ‘विकास मंच’तर्फे अजूनही पाठपुरावा सुरु असल्याचे चाळीसगाव ‘विकास मंच’ चे प्रफुल्ल साळुंखे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here