साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसेच सोयाबीनच्या पिकाला आधारभूत भाव देण्यात यावा, अशी मागणी मलकापुरचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केली आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून पीक विम्याची हक्काची रक्कम व नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात यावी, अन्यथा काँग्रेसच्यावतीने आक्रमकपणे जिल्हाभर जेलभरो, रास्ता रोको तसेच सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही, असा आक्रमक इशारा सरकारला दिला. अशा प्रकारचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी प्रमोद अवसरमोल, राजूभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, डॉ. अनिल खर्चे, ॲड.संजय वानखेडे, जाकीर मेमन, कैलास काळे, ज्ञानदेव हिवाळे, हमीद खान, युसूफ खान, वाजिद खान, शेख मेहबूब, ज्ञानेश्वर निकम, दिलीप बगाडे, अजमत जमदार, भूषण सनिसे, प्रतिक जवरे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडलेला आहे. पर्जमान अतिशय कमी झाल्याने शेतकऱ्यांना हमखास साथ देणारे सोयबीनचे नगदी पिक हातुन निघुन गेले आहे. जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. जून महिना संपूर्णत: कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याला पावसाला सुरूवात झाली. तोही रिमझिम पडत असल्याने १५ ते २० मी.मी. पेक्षा जास्त पाऊस पडला नाही. रिमझिम पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली. शेतही अंकुरले. मात्र, ऑगस्ट महिन्यात पुन्हा मोठा खंड पडल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला. त्यातही सप्टेंबर महिन्यात १५ दिवसाच्या अंतराने पाऊस पडला. त्यावेळी पिकं तग धरून होती. पण फळदाणीसाठी फुले महत्त्वाचे असतांना ती गळून पडत होती. ओलीताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी स्प्रिंक्लर लावून पाणी दिले. कशी-बशी पिके वाढली आणि ‘यलो मोझॅक’ नावाच्या व्हायरसमुळे खोडअळीचा प्रार्दुभाव वाढला. त्यामुळे सोयबीन पिकाची वाटच लागली. शेतकरी सोयाबीनची मळणी करत असतांना झडतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, ही पिके कुठेच दिसत नाही. सोबत सोयबीन दिसत होती. कपाशी दिसत असली तरी वाढ मात्र होत नव्हती. कपासीचे बोंड शोधुनही दिसत नसतांना जिल्ह्याची आणेवारी ६५ टक्के काढण्यात आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे तर अनेकांचा सोयबीन पिकांचा खर्च निघणेही अवघड झाला आहे.
‘यलो मोझॅक’मुळे सोयाबीनचे नुकसान
शासनाच्या धोरणाप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी १ रूपयाचा पीक विम्याचा भरणा केला आहे. त्यामुळे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या हक्काची आहे. पीक विम्याची हक्काची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी. ‘यलो मोझॅक’ रोगामुळे सोयाबीनचे खुप नुकसान झाले आहे. पाऊस कमी झाल्यामुळे रब्बीची पिके येण्याची आशा धुसर झाली आहे. दुसरे कोणतेही पीक आता शेतकऱ्यांच्या हाती राहिले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिशय चिंताग्रस्त झाला आहे. सोयाबीनचे उत्पन्न अतिशय कमी होत असल्यामुळे लागवडीचा खर्च निघणे कमी झाले आहे. अशावेळी शेतकऱ्यांना तातडीने युध्द पातळीवर भरीव मदत देऊन दिलासा देण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.