इमर्जन्सी लोडशेडिंंगने त्रस्त शेतकऱ्यांनी गाठले वीज कंपनीचे कार्यालय

0
35

साईमत, शिरपूर, प्रतिनिधी
 

तालुक्यातील पश्चिम भागातील तऱ्हाडी- वरूळसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कृषी तसेच गावठाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त करीत निवेदन दिले. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.

तालुक्यातील परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी वरुळ येथे 33 के.व्ही.क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रावरून परिसरातील तऱ्हाडीसह वरुळ, भटाणे, जवखेडा, तऱ्हाड कसबे, भामपूर, टेकवाडे नवे -जुने, अंतुली नवे-जुने, लोढरे, तऱ्हाडी, अभानपूर, जळोद, ममाणे आदी गावांच्या गावठाण व कृषी क्षेत्राकरिता विद्युत पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांसह कृषी क्षेत्रातील ग्राहक अक्षरशः वैतागले आहेत. विशेष म्हणजे विजेच्या लपंडावाचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. वास्तविक कृषिक्षेत्राच्या शेड्युलनुसार दररोज किमान आठ तास विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असताना इमर्जन्सी लोड सेटिंंगच्या नावाने दिवस-रात्र पाळीतून केवळ तीन ते चार तास विद्युत पुरवठा होत आहे.

त्यातही गेल्या महिन्याभरापासून परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिके करपू लागली असताना त्यात अपुऱ्या विजेच्या पुरवठ्याने भरचं घातली आहे. त्यामुळे पिकांना कसे वाचविण्याचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ नये, यासाठी विद्युत पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. यासंदर्भात तऱ्हाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार वीज विभागाकडे मागणी ही केली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या या मागणीकडे संबंधितांकडून कानाडोळा झाल्याचे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

अखेर शुक्रवारी तऱ्हाडी, वरुळ, भटाणे, जवखेडा, तऱ्हाडीसबे, अभानपूर, जळोद, भामपूर, टेकवाडे नवे -जुने, लोढरे,नवे -जुने अंतुली परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी वरुळ येथील वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिनेश माळी यांना निवेदन देत कृषी क्षेत्रासाठी रोज आठ तास सुरळीत वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी करीत विजेची समस्या कायमस्वरूपी न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भीमराव ईशी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी धनगर, माजी उपसरपंच ओंकार पाटील, जवखेडा सरपंच कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, विशाल कंरके, लक्ष्मण पाटील, संजय जाधव, योगेश पाटील, छोटु पाटील, परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

चौकट
पावसाने दडी मारल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे पिकं करपू लागली आहेत शेतकऱ्यांच्या कूपनलिकेची पातळी खालावली असल्याने थोडेफार शिल्लक असलेल्या पिकांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रयत्न आहेत विजेअभावी पिकांना पुरेशा पाणी देता येत नसल्याने मोठ्या जोमाने उभे राहिलेले पिक हातातून गेली तर मोठा आर्थिक फटका बसेल आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल.यासाठी तात्काळ उपाययोजना व्हावी ,अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here