ठेकेदारांची 300 कोटींची बिले थकल्यानेच जिल्ह्यातील 1000 कोटींच्या कामांना ब्रेक

0
2

साईमत, जळगाव, प्रतिनिधी
जिल्हाभरातील ठेकेदारांची 300 कोटींची कामे पूर्ण होऊनही बिले शासनानेे अदा केलेली नाहीत. त्यामुळे 300 कोटींची बिले दिल्याशिवाय पुढील कामे करणार नाही, अशी भूमिका जिल्हाभरातील ठेकेदारांनी व त्यांच्या संघटनेने घेतली आहे. त्यामुळेच 1000 कोटींच्या कामांना ब्रेक लागला आहे. तसेच जिल्ह्यातील कामे एकाच ठेकेदाराला दिली जात आहेत. ती सर्व कामे वाढीव दराच्या निविदाधारकालाच दिली आहेत. एकही काम कमी भावाच्या निविधारकास दिलेले नाही. यात तथ्य असल्यानेच कामांना ब्रेक लागला. मी गेल्या 40 वर्षात कुणा अधिकाऱ्यांस ब्लॅकमेल केल्याचे दाखवून द्यावे, असे आ. एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. एकनाथराव खडसे ृअधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत असल्याने तसेच जिल्ह्यातील 1000 कोटींच्या कामांत अडथळा आणल्यानेच कामांना ब्रेक लागला. जिल्ह्यातील विकास कामांना ब्रेक लावल्याने त्यांचे नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, मदत पुनर्वसन मंंत्री ना. अनिल पाटील, खा. उन्मेश पाटील, आ.मगेश चव्हाण  यानी खडसेंच्या निषेधाचा ठराव मांडला होता.  त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच आज आ. एकनाथराव खडसेंनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, महानगरप्रमुख अशोक लाडवंजारी, निरीक्षक प्रसेनजित पाटील उपस्थित होते.

सा.बां.च्या अधीक्षक अभियंता सोनवणे यांचा 200 कोटींचा गैरव्यवहार

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी जिल्ह्यात सुमारे 200 कोटींचा गैरव्यवहार केला आहे. तक्रार केल्यानंतर झालेल्या चौकशीत सोनवणे दोषी असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वीच जिल्ह्यातील मंत्र्यांकडून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकण्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लोकायुक्त आणि औरंगाबाद खंडपीठात येत्या 15 दिवसात दाद मागणार असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी यावेळी दिली.

या वेळी अधीक्षक अभियंता सोनवणे यांच्याविरोधात अनेक पुरावे देत खडसेंनी गंभीर आरोप केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी तांत्रिक सल्ला घेण्यासाठी सोनवणेंनी 6 कोटींचा निधी काढला. शासकीय अधिकारी असतानाही कुठल्या आधारावर व केवळ तांत्रिक सल्ल्यासाठी 6 कोटींचा निधी खर्च केला, याविषयी तक्रार केली आहे. तसेच विधीमंडळात लक्ष्यवेधी मांडल्यावर संबंधित मंत्रीही उत्तर द्यायला सामोरे आला नाही. सोनवणेंनी शासकीय रकमेतून 3 महागड्या सफारी कार मॅकेनिकल विभागाकडून न खरेदी करता सिव्हील विभागाकडून खरेदी केल्या. या गाड्या कोण वापरतय, हे देखील तपासण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील सर्वच कामांच्या निविदा 5 टक्के वाढीव दराने
जिल्हाभरात गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कामांच्या 95 टक्के निविदा 5 टक्के वाढीव दरानेच व विशिष्ट मर्जीतील ठेकेदारांंनाच मंजूर केले आहेत. कमी दराच्या निविदा रद्द करून फेर निविदा काढल्याचा व त्या 5 टक्के वाढीव दराने कामे दिली आहेत. वाढीव दरामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा प्रतापही या अधीक्षक अभियंता सोनवणे यांनी केल्याचा आरोपही खडसेंनी केला आहे.

नाशिकला बदली तरी जळगावातूनही पगार
अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे 14 वर्षांपासून जळगावात सेवारत आहेत. त्यांची  नाशिकला बदली झाल्यावर जळगावचचा अतिरिक्त कारभार सांभाळून त्यांनी या दोन्ही ठिकाणी पगार उकळला आहे. एका अधिकाऱ्याचा दोन ठिकाणी पगार कसा निघू शकतो? असा सवालही त्यांनी केला आहे. जिल्हाभरातील सर्वच स्थानिक स्वराज्य संंस्थांची कामे सा.बां.विभागाकडून केली जात आहेत. यासाठी मंत्र्यांचे, काही आमदारांचे नातेवाईक, समर्थक ठेकेदारांचीच सोय केली जात आहे. सोनवणेंंची बदली होऊनही त्यांना जाणीवपूर्वक संरक्षण देऊन जळगावातच ठेवले जात असल्याचा आरोपही आ. खडसे यांनी यावेळी केला.

जिल्हाधिकारी गोद्रीचा हिशोब का देत नाहीत?

गोद्री येथे पार पडलेल्या ‌‘महाकुंभ‌’चा वारंवार खर्च मागूनही जिल्हाधिकारी हिशेब का देत नाही. या महाकुंभच्या नावाखाली आचारसंहिता असतानाही कुणाच्या परवानगीने हा निधी खर्च केला गेला?  आचारसंहिता असताना जिल्हधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी ? असा सवाल खडसेंनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here