मुंबई: प्रतिनिधी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. अनिल देशमुख यांचा सीबीआयकडून आज पुन्हा जबाब नोंदवला जाणार आहे. त्यासाठी सीबीआयची टीम आज आर्थर रोड कारागृहात पोहोचली आहे. देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंगही आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. कालही सीबीआयने देशमुख यांचा जबाब नोंदवला होता. उद्याही देशमुख यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. देशमुख यांचा जबाब सलग नोंदवला जात आहे. मात्र, सीबीआयकडून देशमुखांवर प्रश्नांची काय सरबत्ती करण्यात आली हे गुलदस्त्यात आहे. काल काही प्रश्नांची उत्तरे अनिर्णित राहिल्याने सीबीआयकडून देशमुख यांना आजही तेच प्रश्न विचारले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सीबीआयची एक टीम आर्थर रोड तुरुंगात पोहोचली आहे. ही टीम अनिल देशमुख यांचा कबुली जबाब नोंदवणार आहे. किती तास ही प्रक्रिया चालेल याबाबत काहीही सांगण्यात आलेलं नाही. यावेळी देशमुख यांचे वकील इंदरपाल सिंगही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. इंदरपाल सिंग हे सुद्धा आर्थर रोड तुरुंगात पोहोचले आहेत.
दरम्यान, यापूर्वी सीबीआयने यापूर्वीही देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर सीबीआयने एक 65 पानी अहवाल तयार केला होता. सीबीआयचे उपअधीक्षक आरएस गुंजाळ यांनी अहवाल सादर केला होता. या अहवालात देशमुख यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे सीबीआयच्या प्राथमिक अहवालात देशमुख यांना क्लिनचिट मिळाल्याची बोललं जात होतं. त्यानंतरही सीबीआयकडून देशमुख यांचा कबुली जबाब नोंदवला जात आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.
देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे.
पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.