साईमत, जळगाव : प्रतिनिधी
आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड यांच्या विविध समस्या व मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकारी व यंत्रणेकडे रितसर अर्ज केलेले आहेत. मात्र, अर्जाची दखल घेण्यात आली नसल्यामुळे २६ जानेवारी, २०२४ पासून ५ लोक उपोषणास बसलेले आहे. तसेच शेकडो होमगार्ड व त्यांचे परिवारातील सदस्यही समर्थन देण्यासाठी धरणे आंदोलन करुन आंदोलनात सहभागी झालेले आहेत. सोमवारी, २९ जानेवारी रोजी आंदोलनाचा ४ था दिवस होता. त्यामुळे आंदोलनाची दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अशा आशयाचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले आहे.
उपोषणामुळे प्रचंड त्रास होत असुन शारीरिक समस्या जाणवत आहे. न्याय मिळावा म्हणून उपोषण सुरु ठेवणार आहे. आमच्या जिवास काही बरेवाईट झाल्यास संबंधित प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांच्या होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन जबाबदार राहतील. उपोषण आंदोलनाविषयी त्वरित संबंधितांना कळवावे व आंदोलनाची दखल घेण्यात यावी, उपोषणकर्त्यांच्या जिवावर बेतणार नाही, असे युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.